इंद्रायणी नदीत दुर्दैवी घटना:मित्राला वाचवताना तीन तरुणांचा बुडून मृत्यू, एक जण सुखरूप बाहेर

देहूरोड पोलिस स्टेशन हद्दीत कीनई गावाजवळील बोडकेवाडी बंधारा याठिकाणी चिखली येथील घरकूल येथील काही तरुण होळी खेळून झाल्यावरती नदीवरती पोहण्यासाठी आले होते. तिथे पुन्हा रंग खेळत असताना एक व्यक्ती पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी तिघांनी पाण्यात उडी मारली. पण बुडणारा व्यक्ती सुखरूप पाण्याबाहेर आला व वाचवायला गेलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी देहुरोड पोलिस स्टेशन पथकाच्या मार्गदर्शनाखाली मृतांचा पाण्यात शोध घेऊन मृतदेह बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेचारच्या सुमारास किन्हई गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या पात्रात घडली. गौतम कांबळे (वय २४), राजदीप आचमे (वय २५) आणि आकाश विठ्ठल गोरडे (वय २४, सर्व रा. घरकूल, चिखली) अशी नदीत बुडून मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळवड सण साजरा करण्यासाठी घरकूल येथील चार ते पाच तरुण कन्हई गाव येथे गेले होते. सर्व तरुण पोहण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरले होते. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तीन तरुण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, रहिवासी, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. काही वेळशोध घेतल्यानंतर पाण्यात तीन्ही तरुणांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान, घरकूल येथे राहणारे तरुण एकमेकांचे मित्र होते. ते धुळवड साजरी करण्यासाठी किन्हई गावात गेले होते. वन्यजीव रक्षक मावळ संस्थाचे निलेश गराडे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, शुभम काकडे, रवी कोळी, गणेश सोंडेकर, विकास दोड्डी, प्रमोद जाधव यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.