जगात मानवता हा एकच धर्म:रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचे वध केला, मोहन भागवत यांचे पहलगाम हल्ल्यावर भाष्य

मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले आहे. जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता, असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. तसेच वेगळेपणाला धरुन जेव्हा जातो त्यावेळी समाजातील अंतर वाढते. एकतेच्या सूत्राला धरुन चालले की आपलेपणा वाढतो, असेही त्यांनी म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले, लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे. काल धर्म विचारून मारले. हिंदू असे कधीही करणार नाही. आपल्या मनात दुख आहे. आमच्या मनात क्रोध आहे. असुरांचे निर्दालन व्हायचे असेल तर अष्टभुजांची शक्ती असलीच पाहिजे. रावण त्याचे मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचे वध केला. पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, आता क्रोधही आहे आणि अपेक्षाही आहे. यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असेही वाटते. समाज एक असेल तर कुणी डोळं वाकडं करुन पाहणार नाही. वाकडे कुणी पाहीलं तर डोळा फुटेल. त्याला दमदार उत्तर देऊ अशी अशी अपेक्षा. द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. तसा मार खाणे हाही आपला स्वभाव नाही. शक्तिवान माणसाने अहिंसक असले पाहिजे. शक्तिहिनाला त्याची गरज नाही. शक्ती आहे ती अशा वेळी दिसली पाहिजे. दरम्यान, पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाल्याची कबुली केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत दिली आहे. काश्मीरमधल्या हल्ल्यानंतर सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दोन तास चालली. त्यात हल्ला झाला तेव्हा सुरक्षा दल, सीआरपीएफ कुठे होते, मदत पोहोचण्यात उशीर का झाला? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मान्य केले. त्याचा शोध घेण्याची हमीही त्यांनी विरोधकांना दिली. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल, त्यासाठी आपण सरकारच्या सोबत आहोत असे आश्वासन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधकांनी दिले.