जालिंदर सुपेकरने बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोने हडपले:150 कोटींचा भ्रष्टाचार केला, सावकाराच्या वकिलाचा आरोप

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या विरोधातील आरोपांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी काल आरोप केल्यानंतर आज पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकर यांच्यावर आणखी गंभीर आरोप केला आहे. जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोघांकडून 550 कोटी रुपये मागितल्याचे कराड यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचेही नाव घेतले. ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुपेकर यांनी विशेष महानिरीक्षक (कारागृह) पदावर कार्यरत असताना अमरावतीतील कारागृहात बंदिवासात असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात तब्बल 550 कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. अमिताभ गुप्तांच्या सहभागाचा आरोप मी सुरुवातीपासून या प्रकरणात कायदेशीर बाजू हाताळतो आहे. रिमांडपासूनच या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घडलेला आहे, असे सांगत निवृत्ती कराड यांनी गायकवाड यांचे बँक लॉकर, सोने व रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मीच तुम्हाला अडकवले, जामिनासाठी 550 कोटींची मागणी गायकवाड पितापुत्रांना येरवाडा कारागृहातून अमरावती कारागृहात वर्ग करण्यात आले होते. अमरावतीला वर्ग केल्यानंतर, 2024 मध्ये सुपेकर यांनी कारागृहात भेट देत त्यांना धमकावले आणि मारहाण केली, असा गंभीर आरोपही कराड यांनी केला. मीच तुम्हाला अडकवलंय, तुम्ही मला पैसे द्या, मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढून देतो. नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दांत सुपेकर यांनी गायकवाड यांना धमकावल्याचे वकील निवृत्ती कराड सांगितले. सुपेकरांचा तुरुंग अधिकाऱ्यांवर दबाव याच दरम्यान, जालिंदर सुपेकरांकडून अमरावती कारागृहातील काही अधिकाऱ्यांवरही गायकवाड पिता-पुत्रांचा छळ करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मिराशे आणि भोसले या अधिकाऱ्यांना गायकवाड पितापुत्रांवर मानसिक व शारीरिक छळ करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यांनी तसे करण्यास नकार दिल्यामुळे सुपेकर यांनी पाच ते सहा कारागृह कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते, असेही कराड म्हणाले. सोलापूरच्या एका कैद्याने जेलमध्ये नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केला होता. आम्ही याबाबत गुन्हा दाखल केला होता, असे वकील निवृत्ती कराड यांनी म्हटले.