जलजीवन मिशनच्या सहा तास चाललेल्या बैठकीत समस्यांचा पाऊस:बहुतांश ठिकाणी वीज जोडणीचाच अडसर, तर कुठे कामाबाबत तक्रार

हिंगोली येेथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या बुधवारी ता. २८ खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित सरपंचांनी समस्यांचा पाऊसच पाडला. कुठे विज जोडणीच देण्यात आली नाही तर कुठे कामाबाबत तक्रार करण्यात आली. तर दुसरीकडे कंत्राटदारांनी निधी नसल्याचा मुद्दाही मांडला आहे. ज्या ठिकाणी कामे पूर्ण करता येतील तेथे तातडीने कामे पूर्ण करून योजना सुरु करण्याच्या सूचना खासदार आष्टीकर यांनी दिल्या. हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आढावा बैठक सकाळी आकरा वाजता सुरु झाली. यावेळी खासदार आष्टीकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कार्यकारी अभियंता अतुल सोळुंके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांची उपस्थित होती. यावेळी खासदार आष्टीकर यांनी प्रत्येक योजना निहाय आढावा घेतला. जिल्हयातील सुमारे १६८ योजनांची कामे ७५ ते ९९ टक्के झाली असून काही किरकोळ कामे राहिल्याचे सांगण्यात आले. तर यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदार यांनी विज कंपनीकडून योजनेसाठी विज जोडणी देण्यास उशीर होत असल्याचे सांगितले. त्यावर खासदार पाटील यांनी तातडीने विज जोडणी देऊन योजना सुरु करण्याच्या सूचना विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या शिवाय काही ठिकाणी योजनेचे काम अर्धवट झाल्याचे सांगितल्यानंतर खासदार पाटील यांनी कंत्राटदार व ग्रामसेवकांना सदर काम तातडीने पूर्ण करून घ्यावे काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. तर यावेळी कंत्राटदारांनी निधीचा प्रश्न उपस्थित केला. यावर लवकरच निधी उपलब्ध करून देण्याच आश्वासनही खासदार पाटील यांनी दिले. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत समस्यांचा पाऊसच पडला. आता या योजना पूर्ण होऊन कामे सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. घोडा, दाती येथील उपकेंद्राच्या कामाची तक्रार कळमनुरी तालु्क्यातील घोडा व दाती येथे ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर झाले असून या ठिकाणी काम सुरुच केले नसल्याची तक्रार जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केली. यावरून खासदार पाटील यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सदर काम दोन दिवसांत सुरु करण्याचे आश्वासन विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.