जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाने दिली मंजुरी:पहलगाम हल्ल्यातील 26 मृतांचे स्मारक बांधणार

पहलगामच्या बैसरन व्हॅलीत २२ एप्रिलला बळी गेलेल्या २६ जणांचे स्मारक बांधण्याचा निर्णय मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाने घेतला. पहलगाम येथेच मंत्रिमंडळाची बैठक २७ मे रोजी घेण्यात आली. त्यात निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बैठकीनंतर जाहीर केले. महाराष्ट्रातून गेलेल्या पत्रकार आणि पर्यटन संस्थांच्या प्रतिनिधींनी पहलगामला भेट दिली. २२ एप्रिल रोजी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्या संदर्भाने या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा केली. ते म्हणाले की, या हल्ल्यामागचा दहशतवाद्यांचा हेतू आम्ही कधीही साध्य होऊ देणार नाही. या हल्ल्यानंतर इथल्या जनतेने पुढे येऊन दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचा निर्धार केला याचा मला आनंद आहे. या हल्ल्यानंतर पर्यटनाची काय हानी झाली आणि किती रुपयांचे नुकसान झाले ही अत्यंत गौण बाब आहे. ते नुकसान केव्हाही भरून काढता येईल. पण आमचे २५ पाहुणे आणि एक आमचा व्यावसायिक यांनी प्राण गमावले. ते आमच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. या २६ जणांचे योग्य स्मारक उभारण्याचा निर्धार आम्ही तेव्हाच केला होता. आज मंत्रिमंडळाने त्याच्या तपशिलावर शिक्कामोर्तब केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment