ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्त्व देता?:सुनील तटकरेंचा लक्ष्मण हाकेंना टोला, अजित पवारांवर केली होती हाकेंनी टीका

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्त्व देता, असे म्हणत लक्ष्मण हाके यांना तटकरे यांनी टोला लगावला आहे. हाके, डोके, पडळकर अशा लोकांना महाराष्ट्र फार काही महत्त्व देत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांना कशाला महत्व द्यायचे? सुनील तटकरे म्हणाले, ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो त्याला कशाला महत्व द्यायचे. राज्याचे प्रमुख हे शेवटी मुख्यमंत्री असतात आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की कुठल्याही प्रकारचा निधी हा दुसऱ्या खात्यात वळवला गेला नाही. कुठल्याही खात्याच्या निधी कमी करण्यात आला नाही. अजितदादा पवार हे उत्तम अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करत आहेत. अशी पावती तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली असेल तर हाके-पडळकर काय बोलतात त्यांना कशाला महत्व द्यायचे? पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, आमच्या प्रवक्त्यांनी त्यांना जी काही नावे, विशेषणे दिली आहे, मला ते शब्द बोलणेही चांगले वाटत नाही. पण त्यांची लायकी काय आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तोल जाऊन कोण कुठे पडत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना फार महत्त्व देऊ नये. पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. यावर प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले, शेवटी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असले पाहिजे हा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ शिंदे यांनी काय मागणी करायची तो त्यांना अधिकार आहे.