कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा बदलणार का?:शिवसेना नेते रामदास कदम यांची मनसे नेते वैभव खेडकर यांना पक्ष प्रवेशाची ऑफर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच कोकणातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडकर यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे नेते वैभव खेडकर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली होती. यातच रामदास कदम यांनी वैभव खेडकर यांचा मी राजकीय गुरु असल्याचे सांगत त्यांना राज ठाकरे यांच्याकडे मीच घेऊन गेलो होतो, अशी देखील पुष्टी जोडली. इतकेच नाही तर पुढे काय करायचे? हे वैभव खेडकर यांना माहिती आहे. ‘समझनेवाले को इशारा काफी है’, असे म्हणत त्यांनी थेट त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. या कार्यक्रमात सर्वच नेत्यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील वाद संपुष्टात आल्याने माझी अडचण दूर झाली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. या दोघांमध्ये वाद असल्यामुळे माझी अडचण होत होती. त्यामुळे रामदास कदम यांना गैरसमज देखील होत होता. मात्र आता त्यांच्यातील वाद दूर झाल्यामुळे माझी अडचण देखील संपली असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र निर्माण सेना आणि महायुती एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता वैभव खेडकर यांच्या माध्यमातून कोकणातील राजकीय समीकरण बदलण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. तसेच या सर्व घटना-घडामोडीमुळे सध्या कोकणात चांगलीच चर्चा रंगली आहे.