महाराष्ट्रात कोरोनाने चिंता वाढवली:वसईत एकाचा मृत्यू, राज्यात 467 सक्रिय रुग्ण

देशात तसेच महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 467 सक्रिय रुग्ण असल्याचे समजते. त्यात आता वसई येथे एका 42 वर्षीय विनीत विजय किणी यांचा कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विनीत विजय किणी हे मुंबई येथील रहेजा रुग्णालयात उपचार घेत होते. विनीत विजय किणी हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यात तपासणीमध्ये त्यांना कोरोनाचे काही लक्षणं असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. लक्षणे सौम्य असली तरी करोनाचा धोका पूर्णतः टळलेला नसून नागरिकांनी अजूनही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात 84 नव्या रुग्णांची भर पडली असून आता 425 च्या वर सक्रिय रुग्ण झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सर्वात जास्त कोरानाचे रुग्ण हे केरळ राज्यात आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे रुग्ण आहेत. तर इतर राज्यात सुद्धा कोरानाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय. काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये नव्याने कोरोनाबाधित 5 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात 86 पर्यंत रुग्णांची संख्या झाली आहे. नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची विभागवार आकडेवारी (30 मे 2025): एकूण 84 रुग्ण : मुंबई – 32, ठाणे – 2, ठाणे मनपा – 14, नवी मुंबई मनपा – 1, कल्याण-डोंबिवली मनपा – 1, रायगड – 2, पनवेल मनपा – 1, नाशिक मनपा – 1, पुणे – 3, सातारा – 2, कोल्हापूर – 1, कोल्हापूर मनपा – 1, पुणे मनपा – 19, पिंपरी चिंचवड मनपा – 1, सांगली मनपा – 3.