महाराष्ट्रातील 500 पर्यटक घरी परतले:उर्वरित 232 प्रवाशांसाठी आणखी विशेष विमानाची व्यवस्था, CM फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींशी साधला संवाद

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले असून आत्तापर्यंत सुमाारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी पाठवली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करत आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काश्मीर खोऱ्यात अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली असून त्यातूनही पर्यटक मायभूमीत परतले आहेत. जखमींसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांनी तिथे लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्या तेथील डॉक्टरांचेदेखील आभार मानले. दरम्यान, गिरीश महाजन यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत मदत केली. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सांगितले की, उद्यासाठी जर तुम्हाला आणखी विमानांची आवश्यकता भासत असेल तर विमाने करा, याचा सर्व खर्च राज्य सरकार देईन. राज्य सरकारकडून विशेष विमानाची तयारी काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरून दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 6 प्रवासी मृत्युमुखी पडले असून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. त्यानंतर, अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता जाणून घ्या महाराष्ट्रातील जखमी आणि मृत पर्यटकांची नावे… मृतांची नावे-
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल