माझ्या राजकीय अनुभवावरून मी योग्य वेळी बोलेल:मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य, म्हणाले- माझा काहीही संबंध नाही

माझ्या राजकीय अनुभवावरून मी योग्य वेळी बोलेल:मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य, म्हणाले- माझा काहीही संबंध नाही

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येणार असल्याचे संकेत देखील दिले आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील सूचक विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीविषयी प्रश्न विचारला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेल. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरून मी योग्य वेळी बोलेल. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्यावर मी कशी प्रतिक्रिया देणार. माझा काय संबंध येतो. यांनी साथ द्यायची आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही. मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. एकनाथ शिंदे पुण्यात क्रेडाईच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीविषयी प्रश्न विचारला असता तेव्हा त्यांनी हात जोडत प्रतिक्रिया दिली. तसेच आमची महायुती मजबुतीने लढणार, मजबुतीने जिंकणार, असे त्यांनी यावेळी म्हटले. 12 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण दरम्यान, गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नक्षलविरोधी पथकातील जवानांचा सत्कार केला आणि अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केले आहे. यामध्ये नक्षल चळवळीत डीव्हीसीएम पदावर कार्यरत असलेल्या अंजू आणि सरिता या दोन महिला माओवाद्यांनी एके-47 रायफलसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना संविधान भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस जवानांशी संवाद साधला. गेल्या तीन-चार वर्षांत नक्षल चळवळीला आळा घालण्यात नक्षलविरोधी पोलिस पथकाने मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त चाळीस माओवादी उरले असून, माओवादी चळवळीला हादरा बसवण्याचे काम पोलिस जवानांनी केले, असे म्हणत फडणवीसांनी पोलिस जवनांचे कौतुक केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment