मुंबईच्या आर सिटी मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी:रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण, नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय; तपास सुरू

मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलमध्ये सोमवारी एका व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले आहे. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी असे असून त्यांचे वय 38 वर्ष होते. दीपक यांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, या घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही घटना घडताच पार्कसाइट पोलिसांना याबाबत माहिती देण्यात अली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दीपक यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू केलेल्या आहे. दीपक जोशी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना सकाळी सोमवारी 11.30 च्या सुमारास घडली. या घटनेच्या वेळी आर सिटी मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, सकाळी 11.30 च्या सुमारास आर सिटी मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले. मात्र, थोड्यावेळातच सगळा प्रकार लक्षात आला. आम्हाला लॉबीत एक तरुण जमिनीवर पडलेला दिसला. त्या तरुणाचे डोके फुटले होते आणि त्यामधून रक्तस्राव सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. घाटकोपरच्या कामा लेनमधील बारोटवाडी येथे राहणारा दीपक जोशी याच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दीपक आपल्या आई-वडील, पत्नी आणि मुलासह राहत होता. सध्या त्याचा मुलगा कच्छमध्ये मामाच्या घरी शिक्षण घेत आहे. दीपक हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दीपकचे लहानपणापासूनच मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. तो झटपट पैसा कमविण्याच्या नादात अनेक आर्थिक फसवणुकीत अडकला होता. दहा वर्षांपूर्वी बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटक, तसेच कर्ज घोटाळ्यांतही त्याचा सहभाग होता, असे उघड झाले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, वडील लहानसहान काम करतात, आई स्वयंपाकाचे काम, तर पत्नी मुलांची देखभाल करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होती. मात्र दीपकला नेहमी शॉर्टकटने पैसा कमावण्याची हाव होती. या सगळ्या तणावाखाली दीपकने याआधी दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा तर वाशी पुलावरून उडी मारली होती, पण त्या वेळी मच्छीमारांनी त्याचा जीव वाचवला होता. दीपकच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.