मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरे संतापले:’भाजप शासित मुंबई’ म्हणत एकनाथ शिंदे यांचा ‘भ्रष्ट-नाथ शिंदे’ असा उल्लेख

मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यावरून उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या वेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप शासित मुंबई असा उल्लेख करत राज्य सरकारवर टीका केली आहे. इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख देखील त्यांनी भ्रष्ट-नाथ शिंदे असा केला आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाले नसेल तर घाईघाईत उद्घाटन करण्यावरून देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाऊस लवकर आला हा महानगरपालिकेचा युक्तिवाद हा पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अजिबात तयारी करण्यात आली नव्हती, असा आरोप देखील त्यांनी केला. रस्ता खचला, तो नवा रस्ता आहे, मग तो खचला कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या परिसरात पडलेली भिंत ही तात्पुरती उभारण्यात आली होती, असा दावा देखील अधिकारी करत आहेत. मग ती कोसळण्यासाठी उभारली होती का? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला आहे. यांच्या भ्रष्टाचारामुळे शिवरायांचा पुतळा कोसळला होता. आता मुंबईच्या कामात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. नुकसानग्रस्तांना सरकारने मदत द्यावी काल मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचला असून या प्रकरणात अनेकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना सरकारने मदत द्यावी, अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ही मदत महानगर पालिकेने नाही तर राज्य सरकारकडून करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मंत्रालय परिसर साचलेल्या पाण्यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.