मुंब्रातील या भीषण अपघाताला रेल्वे जबाबदार:दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करावी, जितेंद्र आव्हाडांची मागणी

मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करण्याची देखील मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मागच्या दशकापासून म्हणजे 2000 ते 2025 दिवा, मुंब्रा ते कळवा येथील लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. यातील सर्व मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोक. यांचे प्रवासाचे माध्यम कोणते तर लोकल. या लोकसंख्येची सोय रेल्वेने बघितली नाही. आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर लोकलची संख्या वाढली आहे का? नाही. माझी आज पण हीच मागणी आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. यामुळे प्रेशर कमी होईल, लोक लोकलच्या दरवाजात कमी उभे राहतील. कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांचीही सोय होईल आणि दिवा, मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल. कळव्याला येणाऱ्या लोकलमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, रेल्वेने कुठलीही प्रगती केलेली नाही. कळव्याला पूर्वी एक सोय होती की कळव्याचे जे वर्कशॉप आहे तिथून काही दोन-तीन लोकल सुटायचे. त्यावेळचे नागरिक जिवावर उदार होऊन उड्या मारून या गाड्या पकडायच्या, आता ही चुकीचे होते की गैर होते ते माहीत नाही, पण किमान या लोकांना बसायला तरी जागा मिळायची. पण आता रेल्वेनी काय केले आहे, त्यांनी आता भिंत उभारली आहे. कळव्याला येणारी लोकल पूर्ण भरलेली असते, मुंगी शिरायलाही जागा नसते. एवढे गंभीर अपघात होत असताना रेल्वेने विचार करायला पाहिजे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातले तीन पोल अतिशय जवळ आहेत. आत्तापर्यंत त्या पोलला धडकुन हजार लोक मेले असतील. अनेक वर्षांची मागणी आहे की तो पोल बाजूला घ्या, पण रेल्वे यांच्या कानावर गोष्टी उशिरा पडतात किंवा पडतच नाहीत आणि पडल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिव्यावरून मुंब्राला येताना एक खतरनाक टर्न आहे पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशाच्या रेल्वे महसुलात सर्वाधिक महसूल कुठून मिळत असेल तर ते आहे मुंबई लोकल. मुंबई लोकलमधून सर्वाधिक महसूल मिळतो. मुंबई लोकलला किती सुविधा दिल्या जातात, हा तर प्रश्नच आहे. हे मृत्यू टाळता कसे येतील? जसे मी सांगितले की, दिव्यावरून मुंब्राला येताना एक खतरनाक टर्न आहे, त्यात रेल्वेचा रॅक असा तिरका होतो. हे सगळे उत्तर रेल्वेने द्यायला हवे. रेल्वे या घटनेला जबाबदार आहे एसी लोकल वाढवल्या पण सर्वसामान्य लोकांच्या लोकल वाढवल्या का? एसी लोकल वाढल्याने सामान्य लोकल कमी झाल्या. एसी लोकल सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आणि न परवडणाऱ्या लोकांची संख्या मुंबईत अधिक आहे. ज्यांना एसी लोकल परवडत नाही ते मरत आहेत. दारावर लटकणाऱ्यांची संख्या जेव्हा कमी होईल त्यादिवशी रेल्वेचे यश आहे. ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे सर्वसामान्य लोकलला बसवणे अशक्य आहे. आतमध्ये गुदमरतील लोक. श्वास घ्यायला हवा तर आली पाहिजे न. तसेच या घटनेला जबाबदार रेल्वे आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.