नाशिक सिंहस्थ कुंभमेळा:मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, तेराही आखाड्याचे प्रमुख साधू उपस्थित; कधी असणार पहिले शाही स्नान?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सर्व आखाड्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या संदर्भातली तेराही प्रमुख आखाडे आहेत त्याच्या नंतर साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाच्या मंडळी अशा सगळ्या सोबत एक बैठक झाली. या बैठकीत कशाप्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्यावर चर्चा झाली. सर्व आखाड्यांचे म्हणणे आम्ही ऐकून घेतले आणि त्यासोबत आम्ही आतापर्यंत काय कारवाई केली आहे ते सांगितले. गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीने एसटीपीचे काम असेल पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4 हजार कोटी रुपयांचे वेगवेगळे कामाचे निवेदन या आपण काढल्या आहेत त्या अंतिम टप्प्यावर आहेत. जवळपास दोन हजार कोटींच्या आणखी निविदा आपण काढत आहोत. प्रामुख्याने गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीने एसटीपीचे काम असेल. तसेच गोदावरी वाहती राहिली पाहिजे त्यासाठी मंत्री गिरीश महाजन एक चांगली योजना तयार केली आहे, त्याला मान्यता देण्याचे काम असेल. या ठिकाणी विशेषतः जी काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावण्याचे काम केले आहे. पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर एकमत झाले आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन याच गोष्टींवर एकमत आपण केले आहे. विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होत असते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर एकमत झाले आहे. जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या स्टॅम्पिडची वेळ त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचे प्रयत्न आपले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सिंहस्थ कुंभ मेळावा आहे हा जास्त काळ चालणार आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमृत स्नानाची जे काही पर्व आहेत त्याच्या तारखा देखील संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केले आहेत. ते आता सेपरेटली उपलब्ध करून देऊ. यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात परवाच्या तारखा उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठल्यातरी एकाच दिवशी गर्दी करण्याची गरज पडणार नाही. या वेळचा जो आपला सिंहस्थ कुंभ मेळावा आहे हा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पवरणी या ठिकाणी आहे. म्हणून मला असे वाटते की जे काही भाविकांची गर्दी आहे त्याचे योग्य नियोजन आपल्याला करण्याची संधी मिळाली आहे. एक अतिशय सुव्यव्यवस्थित कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतले आहेत. साधू ग्रामची जागा अधिग्रहित करायची आहे साधू ग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती आता ती अधिग्रहित करायची आहे आणि याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. प्राधिकरणाला मान्यता मिळाली असून त्याचे लवकरच आम्ही गठण करणार आहोत, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. कधीपासून होणार कुंभमेळा पर्वाला सुरुवात? 31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. 29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. तर 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात या तारखांची अधिकृत घोषणा करतील.