नाशिकच्या डावखल जंगलातून मालेगाव-गुजरातपर्यंत तस्करांचे जाळे:सागाची साल काढून झाड वाळवण्याचा फंडा; 700 रुपये नगाची तब्बल 3 हजारांत तस्करी

नाशिकच्या डावखल जंगलातून मालेगाव-गुजरातपर्यंत तस्करांचे जाळे:सागाची साल काढून झाड वाळवण्याचा फंडा; 700 रुपये नगाची तब्बल 3 हजारांत तस्करी

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या डावखल जंगलात सागाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. आधी झाडाची साल काढून त्याला वाळवले जाते. मग ते तोडून पुरावा नष्ट करण्यासाठी खोड जाळून आग लागल्याचा बनाव रचला जातो. सागाचा ३ इंच रुंद व ८ फूट लांब एक नग ७०० रुपयांत येथे मिळवून मालेगाव व गुजरातला ३ हजार रुपयांत त्याची तस्करी येथून सुरू आहे. येथील बांबूच्या जंगलाचेही चित्र वेगळे नसून ‘दहा रुपये दराने बांबू तोडून देऊ, तुम्ही फक्त गाडी घेऊन या,’ अशी सरळ सरळ बोलणी केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले. या जंगलात १११ हेक्टरवर बांबू व ५० हजारांवर सागाची ४० वर्षे जुनी झाडे होती. परंतु, स्थानिकांच्या मदतीने सध्या हा भाग तस्करीचा अड्डा बनला असून जंगल संरक्षणासाठी येथे एकही वन कर्मचारी दिसून आला नाही. कुत्तरबारीमार्गे कळवण, मालेगाव तर भुसणी घाटातून गुजरातेत तस्करी सुरू आहे. चेकपोस्ट पाच वर्षांपासून बंद : तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने भावनगर रस्त्यावरील मळगाव येथे उभारलेले चेक पोस्ट पाच वर्षांपासून बंद असून खिडक्या चोरीस गेल्या आहेत. आरटीओत नोंद नसलेल्या वाहनाने तस्करी तस्करीसाठी सागाची साल काढली जाते. झाड वाळल्यानंतर ताेडले जाते व पुरावा नष्ट करण्यासाठी खाेड जाळले जाते. तस्करीसाठी आरटीओकडे रेकॉर्ड नसलेल्या वाहनांचा वापर केला जात आहे. महिन्याकाठी ३० वाहनांतून लाकडांची तस्करी सुरू आहे. प्रत्येक गाडीमागे महिन्याला पन्नास हजार हप्ताही ठरलेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तस्करीचा धंदाही बिनदिक्कत सुरू आहे. रोजच्या तस्करीमुळे जंगलात २० हजार सागाची झाडेदेखील सापडणे मुश्कील झाले आहे. तस्करीचे वन विभागाचे लाकूडही चोरट्या मार्गाने सॉ मिलकडे वाहून नेले जाते. डावखल वनात प्रवेश केल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूचे बांबू व सागवानाची झाडे दिसतात. त्यामुळे जंगल सुरक्षित असल्याचे दिसते, परंतु वनाच्या ५०० मीटर आत जाताच जंगलाचे विदारक दृश्य बघावयास मिळते. महिन्याकाठी ३० वाहनांतून चोरी, ५० हजार रुपयांचा हप्ता थेट प्रश्न सोमनाथ आमले, वनपरीक्षेत्र अधिकारी, सटाणा जंगलातून साग, बांबूतोड होतेय, काय कारवाई केली?
याबाबत मी माहिती घेईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.
जंगल पूर्ण नष्ट होत चालले. आपण कधी पाहणी केली का?
अद्याप मी पाहणी केली नाही.
भुसनी घाट व कुत्तरबारी मार्गावर चेकपोस्ट आहे का?
नाही.
दक्षता समितीने केव्हा पाहणी केली?
ती माहिती मी कशाला ठेवू? तेथील वनपालला विचारा.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment