राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला हिंगोलीत मोठा धक्का:अनिल पतंगे हाती घड्याळ बांधण्याच्या तयारीत, अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) घवघवीत यश मिळवले. याउलट, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत आहेत, आणि ही घडामोड अधिक गती घेत असल्याचे दिसत आहे. हिंगोलीच्या राजकारणातही अशाच एका मोठ्या उलथापालथीचे चित्र स्पष्ट होत आहे. शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पतंगे आता शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, यामुळे शरद पवार गटाला हिंगोलीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा पक्षप्रवेश सोहळा 8 जून रोजी सेनगाव येथे होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खास हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या कार्यक्रमात सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक व ग्रामीण भागातील पदाधिकारी देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार याविषयी बोलताना अनिल पतंगे म्हणाले, सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही 8 तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव येथे हा पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या कार्यक्रमासाठी जिवाभावाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. विरोधात असल्याने विकासकामांवर परिणाम होतो पुढे बोलताना अनिल पतंगे म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांना प्रतिसाद देत आम्ही सर्वजण पक्ष प्रवेश करणार आहोत. शरद पवार यांच्यावर आमची कोणतेही नाराजी नाही. कारण निष्ठावंत म्हटल्यावर नाराजी व्यक्त करणे चुकीच आहे. परंतु, काळानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मागील दहा वर्षापासून सातत्याने विरोधात बसतोय. त्याचा परिणाम विकासकामावर होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही हा निर्णय घेतला, अशी माहिती पतंगे यांनी दिली आहे.