राष्ट्रवादी मिलनाबाबत अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट:म्हणाले – पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकदशीपर्यंत बहीण-भाऊ एकत्र येतील

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना मोठ गौप्यस्फोट केला. पांडुरंगाची ईच्छा असली तर बहीण-भाऊ आषाढी एकादशी पर्यंतही एकत्र येऊ शकतात, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सूतोवाच केले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असे म्हटले होते. आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या पुनर्मिलनाबाबतच्या चर्चांना उधाण आले असताना, सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्याची चर्चा केंद्रस्थानी आली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यामुळे अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा मागे पडली होती. नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी?
पांडुरंगाची ईच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोट मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पुण्यात पक्षाचा मेळावा होत आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत वाट पाहावी, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. एकत्र येण्यावर कोणाचाही विरोध नाही दोघांच्याही एकत्र येण्यावर कोणचाही विरोध नाही. मध्यंतरी आमच्या पक्षाकडून विरोध असल्याच्या बातम्या चालल्या. पण आमच्या पक्षाकडून विरोध करण्याचे कारण नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेब आणि अजित पवार आम्हाला जे काही आदेश देतील, ते आदेश शिरसावंद्य समजून पुढे जाऊ, असे सांगत तूर्तास तरी कुठलाही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम नाही
अमोल मिटकरी यांनी यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही भाष्य केले. दोन्ही भाऊ एकत्र येणे महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी सुचिन्ह आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी माणसांची ताकद वाढणार आहे, असे ते म्हणाले. निश्चितच दोघे भाऊ एकत्र आल्यावर राजकीय समीकरणे बदलणार, दोघे भाऊ एकत्र येत असल्यास त्यांच्या, आणि मराठी माणसाच्या, मुंबईच्या दृष्टीने राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण, महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. दोघे भाऊ एकत्र यावा हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. जर दोघे भाऊ एकत्रित येत असतील तर त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… ठाकरे बंधूंनी शिंदेंसोबत अखंड शिवसेना तयार करावी:शिंदे गटाच्या नेत्याचे विधान; शिंदेंवर अनुभवाचा फायदा घेतला नसल्याचा आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या युतीची गरमागरम चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी हे दोघे बंधू एकत्र यावेत ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली आहे. राज व उद्धव यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. या दोघांसह शिंदे यांनीही एकत्र येऊन एक अखंड शिवसेना तयार करावी, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी शिंदेंवर आपल्या अनुभवाचा कोणताही फायदा घेतला नसल्याचा आरोप करत त्यांची शिवसेना भाजपप्रणित असल्याचाही दावा केला. पूर्ण बातमी वाचा…