या नीचपणाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे:वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया; फरार आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथके तयार

या नीचपणाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे:वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया; फरार आरोपींना अटक करण्यासाठी 6 पथके तयार

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत यांनी वैष्णवीच्या वडिलांची तसेच काकांची भेट घेतली आहे, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. हा जो नीचपणा आहे त्याची कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उदय सामंत म्हणाले, हा नीचपणाचा कहर आहे. पोलिस अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केली आहे. तिघांना अटक केली आहे. दोन लोकांसाठी 6 पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील 24 तासांत त्या दोघांना अटक करण्यात यश येईल. हा जो नीचपणा आहे त्याची कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अशा पद्धतीचे धाडस कोणी भविष्यात करू नये, अशा पद्धतीची शिक्षा या पाच लोकांना झाली पाहिजे. शासन कुटुंबाच्या पाठीशी आहे पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, सुदैव एक आहे की जे बाळ आहे ते कसपटे कुटुंबाच्या ताब्यात पोलिसांनी दिले आहे. अशा गोष्टींचा परिणाम कायमस्वरूपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांशी चर्चा केली की फक्त या पाच लोकांवर थांबू नका. अजून जे कोणी असेल याचा देखील तपास करावा. गायकवाड साहेबांशी देखील माझी चर्चा झाली आहे. यामुळे कसपटे परिवार समाधानी आहे. परंतु गेलेली जी व्यक्ती आहे ती परत येऊ शकत जरी नसली तरी भविष्यात या घरात जो आघात झाला आहे तो पुन्हा होऊ नये, याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे. शासन कुटुंबाच्या पाठीशी आहे. तसेच या नीचपणाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच आमची भूमिका आहे. या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे उदय सामंत म्हणाले, हा जो काही विषय आहे हा विकृतपणाचा कळस आहे. हा नीचपणाचा कळस आहे. अशा पद्धतीने एक वर्षात पैसे मिळाले नाहीत, गाडी मिळाली नाही, स्वतःला मोबाईल मिळाला नाही म्हणून अशा सुशिक्षित कुटुंबाने राजकारणात जगाचे कैवारी म्हणून फिरत असतात अशा लोकांनी अशा प्रकारचा अत्याचार करणे म्हणून मी हा शब्द वापरला की हा नीचपणाचा कळस आहे. या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजेत राजेंद्र हगवणे हे अद्यापही फरार आहेत. त्यांच्या मोठ्या सुनेने 2024 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावर उदय सामंत म्हणाले, कोणत्याही पक्षाचा, कोणताही कार्यकर्ता असला तरी त्याला काही असे करायचे सर्टिफिकेट नाही दिलेले. त्यामुळे त्याचा जो काही राजकीय आवाका असेल किंवा अन्य काही असेल त्याच्याशी निगडीत न राहता कठोर शिक्षा करण्यात यावी हीच आमची भूमिका आहे. तसेच मोठ्या सुनेने आधीच तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काहीच का केले नाही याची माहिती माझ्याकडे नसली तरी त्याची माहिती आम्ही नक्कीच घेऊ. परंतु राजकीय पुढाऱ्याने असे काही करावे असे कुठे लिहिलेले नाही. निर्घृणतेचा जो कळस गाठला आहे, मी पुढारी आहे, मी राजकीय नेता आहे, मी कोणत्यातरी पक्षात काम करतो म्हणजे मला सगळ्या मुभा आहेत, असे चित्र भविष्यात कुठेही निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे आणि जे आरोपी आहेत ते शिक्षेपर्यंत पोहोचले पाहिजेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment