पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही:हे काही लेच्यापेच्या काँग्रेसचे सरकार नाही, नितेश राणेंचा हल्लाबोल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातील अनेक देशांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताने तातडीने कारवाई करत पाकिस्तानला 5 मोठे निर्णय देखील घेतले आहे, त्यात सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला पुरवठा करणे बंद केले आहे. दरम्यान, या घटनेवर भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा अब्बाही वाकड्या नजरेने बघणार नाही, असा धडा शिकवला जाईल, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. नितेश राणे म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात महत्त्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. 2014 नंतर आतंकवाद असो किंवा पाकिस्तान, देशाची प्रतिमा कणखर राहिलेली आहे. हे काय मनमोहन सिंग यांचे सरकार नाही, हे गांधी परिवाराचे केंद्र सरकार नाही, हे मोदीजींचे केंद्र सरकार आहे. 2014 च्या नंतर आपल्या देशाकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेला आहे. पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा अब्बा पण वाकड्या नजरेने बघणार नाही. लेच्यापेच्या काँग्रेसचे सरकार नाही नितेश राणे म्हणाले, आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला पाहिजे. हे मनमोहनसिंगांचे, लेच्यापेच्या काँग्रेसचे सरकार नाही, हे कणखर राष्ट्रभक्त, देशभक्तांचे सरकार आहे. मोदीजी पाकिस्तानला धडा शिकवतील. त्यामुळे पाकिस्तान परत आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील करणार नाही. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे. यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, शेंबड्या लोकांना तुम्ही देशाचे प्रश्न विचारता. भांडुपच्या देवानंदला देशपातळीचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रश्न विचारल्यावर अशीच उत्तर मिळणार. त्याचा मालक ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, त्यावेळी कोरोना काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. त्यावेळी, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता का? त्यामुळे कुठल्या तोंडाने अमित शहा यांचा राजीनामा मागतोय?, असा पलटवार राणेंनी केला आहे.