पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या कंपन्या महाराष्ट्रात सुरूच!:शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप, मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याची केली मागणी

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचे वातावरण अद्यापही आहेत. भारताने पाकिस्तानसोबत अनेक करार रद्द केले आहेत. सिंधू पाणी करार देखील रद्द केला आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा व्यवहार पाकिस्तानसोबत केला जाणार नसल्याचे धोरण भारताने अवलंबले आहे. अशात जे देश पाकिस्तानच्या बाजूने आहेत त्या देशांवर देखील निर्बंध लादण्यात येत आहेत. परंतु या देशांमधल्या काही कंपन्या अजूनही महाराष्ट्रात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणती पावले उचलली आहेत? अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत राष्ट्रहितासाठी कोणती पावले उचलली आहेत याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली असताना चीन, तुर्की, अझरबैजान या देशांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली. या देशांशी थेट किंवा मालकी संबंध असलेल्या काही कंपन्या या महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांमध्ये व इतर सरकारी विभागांत सहभागी आहेत. या कंपन्यांशी होणारा आर्थिक व्यवहार अप्रत्यक्षपणे दहशतवादी कारवायांना मदत ठरू शकते. त्यामुळे या कंपन्याविरोधात सरकारने राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणती पावले उचलली आहेत? याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून याबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांना तीन प्रश्न विचारले आहेत. 1. चालू किंवा आगामी प्रकल्पांमध्ये वर उल्लेख केलेल्या देशांमधील नागरिकांशी संबंधित कंपन्यांचा सहभाग ओळखण्यासाठी आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी एमएसआरडीसीने कोणते उपाय केले आहेत? 2. अलीकडील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे किंवा सल्ल्यानुसार काही योग्य तपासणी किंवा सुरक्षा तपासणी सुरू केली आहे का? 3. खरेदी पद्धती मोठ्या राष्ट्रीय हिताशी जुळवून घेण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, विशेषतः नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोसारख्या इतर सरकारी संस्थांनी आधीच घेतलेल्या कृतींच्या पार्श्वभूमीवर, ज्यांनी अलीकडेच विरोधी राष्ट्रांशी संबंधित कंपन्यांसाठी सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे का? दरम्यान, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही कारवाई औपचारिकरित्या संपलेली नाही तर ती फक्त थांबवण्यात आली आहे. 10 मे पासून पाकिस्तानविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे, परंतु नियंत्रण रेषेवर सैन्य 24×7 पहारा देत आहोत. त्यामुळे अद्यापही दोन्ही देशांच्या सीमा रेषेवर तणाव असल्याचे स्पष्ट होते.