पाकिस्तानला पुरवली भारताची गोपनीय माहिती:ठाण्यातून गद्दाराला अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी तपास यंत्रणांना भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला ठाण्यातून अटक केली आहे. देशाच्या या गद्दाराची चौकशी केली असता असे समजले की हा आरोपी पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या नोव्हेंबर 2024 पासून संपर्कात होता. फेसबुकच्या माध्यमातून हा संपर्क होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रविंद्र मुरलीधर वर्मा असे असून तो 25 वर्षांचा आहे. संरक्षण दलात छोट्या पदावर हा कार्यरत होता अशी माहिती आहे. याला अटक केल्यानंतर याची कसून चौकशी सुरू आहे. संबंधित आरोपी हा मूळचा ठाण्याचा असल्याचे समजते. भारताने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. तसेच आता रविंद्र वर्मा याने देशाशी गद्दारी का केली? पैशांसाठी केली की याला देखील हनीट्रॅपच्या माध्यमातून आमिष दाखवण्यात आले, याचा तपास एटीएस अधिकारी करत आहेत. दरम्यान, देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी एटीएस पथकाने संबंधित व्यक्तीसह तो संपर्कात असलेल्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसने कलम 3(1), ब, 5(अ), भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 61(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. परंतु या नंतर देशात अनेक गद्दार असल्याचे समोर आले. हरयाणातील ज्योती मल्होत्रा या सोशल मीडिया एन्फ्लुअर्सलाही अटक करण्यात आली आहे. होय, आम्ही पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याची कबुली ज्योतीने तपासादरम्यान दिली. त्यामुळे आता ज्योती मल्होत्राच्या अडचणीत वाढ होणार आहे. याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत सांगण्यात आले नसून वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावरुन ही माहिती समोर आली आहे. त्यातच, आता ठाण्यातून आणखी एका देशाच्या गद्दाराला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे देशात अजून किती गद्दार आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.