‘समृद्धी’ला लोकांनी सुरुवातीला विरोध केला:पण शेवटी जमिनीचे दर पाहून आम्हाला पाठ दाखवत पैसे घेतले; अजित पवारांनी सांगितला किस्सा

‘समृद्धी’ला लोकांनी सुरुवातीला विरोध केला:पण शेवटी जमिनीचे दर पाहून आम्हाला पाठ दाखवत पैसे घेतले; अजित पवारांनी सांगितला किस्सा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे पर्यंतच्या 76 किमी लांबीच्या अंतिम टप्प्याचे आज उद्घाटन झाले.या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महामार्गासंबंधीचा एक किस्सा सांगितला. ‘समृद्धी’ला लोकांनी सुरुवातील विरोध केला, पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी जमिनीचे दर जाहीर केल्यानंतर लोकांनी आम्हाला पाठ दाखवून पैसे घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. फडणवीसांच्या या ड्रीम प्रोजेक्टला सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी पूर्वीचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगरला एक बैठक झाली. हा महामार्ग अजिबात होऊ द्यायचा नाही, सगळ्यांनी या प्रोजेक्टला विरोध करण्याचे त्या बैठकीत ठरवले. पण नंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महामार्गाासाठी लागणाऱ्या जमिनीचा दर जाहीर केला, तेव्हा त्यावेळी विरोधासाठी आम्हाला समर्थन देणाऱ्या सगळ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली. त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला जमिनी देत पाठिंबा दिला, असा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला. ८८०० हेक्टर जमीन आणि हजारो पूल अजित पवार पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी सुमारे ८ हजार ८०० हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. या महामार्गावर १ हजार ९०३ लहान-मोठे पूल आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये महामार्ग खुला झाला, त्यावेळी २ लाख वाहने यावरून प्रवास करत होती. आता मे २०२५ मध्ये १० लाख वाहने प्रवास करत आहेत. ही संख्या अशीच वाढत राहणार आहे. शेवटी लोकांची सोय झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महामार्गावरील सोयी-सुविधांमध्येही सुधारणा केली जात आहे. स्वच्छतागृहे, अल्पोहार केंद्रे, विश्रांती स्थळे यासाठी टेंडर काढण्यात आले असून लवकरच या सुविधा कार्यान्वित होतील. लोकांच्या मनातील शंका आणि अडचणी दूर करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असे ते म्हणाले. १२ कोटी सिमेंट पोत्यांचा वापर समृद्धी हा ७०१ किलोमीटर लांबीचा असून देशातील सर्वाधिक रुंदीचा महामार्ग आहे. महामार्गाचा सुरुवातीचा खर्च ५५ हजार ५०० कोटी रुपये होता, जो आता ६१ हजार कोटींपर्यंत गेला आहे. ६१ हजार कोटी खर्च करून १० थेट आणि १४ अप्रत्यक्षपणे जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे. या संपूर्ण महामार्गासाठी १२ कोटी सिमेंटच्या पोती लागल्या आहेत. ७ लाख मेट्रिक टन स्टील आणि १४ घटमीटर भराव करण्यात आलेला आहे. ८ कोटी घनमीटर खोदकाम केलेले आहे. त्या खोदकामात निघालेला मालापैकी ६ कोटी माल रस्त्याच्या कामात वापरण्यात आली आहे., असे अजित पवारांनी सांगितले. शिंदेंनी आमच्या गाडीचे सारथ्य उत्तम केले आमच्या गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदेंनी केले होते. बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. सर्व काही सुरळीत चालले की नाही, ते मी मागे बसून बघत होतो. माझ्यासोबत अनिल गायकवाड होते. ते हळूच माझ्या कानात सांगायचे दादा असे केले पाहिजे, दादा तसे केले पाहिजे. जाताना गाडीने व्यवस्थित गेली. एकनाथ शिंदेंनी कोणताही धोका न पत्करता आमच्या गाडीचे सारथ्य उत्तमप्रकारे केले, असे अजित पवार म्हणाले. मी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवून होतो येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले. हे महाराज गाडीत बसताच गाडीने १०० चा स्पीड घेतला. नंतर १२० वर पोहोचला. अनिल गायकवाड विचारले असता, ते म्हणाले बोगदा येईपर्यंत १२० चा स्पीड आहे. बोगदा सुरू झाल्यानंतर १०० राहील. बोगदा आल्यानंतर फडणवीस १०० स्पीड करतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांच्यावर लक्ष्य ठेवून होतो. पण बोगदा सुरू झाल्यानंतर फडणवीसांनी बरोबर १०० वर स्पीड आणला. कारण बोगद्यामध्ये १०० च्या जावे, असे लिहिले होते. अशा सगळ्या नियमांचे पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही येथे पोहोचलो. आम्ही उतरवलेल्या विम्याचा उपयोग करावा लागला नाही, अशी मिश्कील फटकेबाजी अजित पवारांनी या उद्घाटनानंतर अजित पवारांनी केली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment