राज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण सुरू:राष्ट्रभक्ती आणि शिस्तीचे धडे देण्यासाठी 2.5 लाख माजी सैनिकांची मदत; शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा

राज्यातील शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करत आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्कराचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लहान वयातच राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजावी नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले की, “राष्ट्र प्रथम” ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजावी, यासाठी पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. या उपक्रमासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, तसेच एनसीसी, स्काऊट-गाईड्स यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी राज्यातील सुमारे 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेतली जाणार असून, ते प्रशिक्षण देणाऱ्या गटाचा भाग असतील, असेही भुसे यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुण निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण दादा भुसे म्हणाले, इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच या विषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे ते म्हणालेत. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्र प्रथम ही संकल्पना पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना नुकतेच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्र प्रथम ही संकल्पना आढळून आली. त्यामुळे हाच दुवा पकडत राज्यातही राष्ट्र प्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे दादा भुसे म्हणाले आहेत.