ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘आपले गाव, आपली जबाबदारी’ संकल्पना:ग्रामविकास, पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा एक प्रचंड अभिमानाचा व स्वातंत्र्याचा दिवस आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज कारभाराचा अभ्यास केला जातो व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व विचारा वरच मार्गक्रमण करत आहे. तसेच ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून गाव तिथे योजना व आपले गाव आपले जबाबदारी या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याभिषेक दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून स्वराज्याची गुढी उभारली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश नवले व अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, 361 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. तो आजचा दिन आपल्यासाठी प्रचंड अभिमानाचा असल्याचे सांगून शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविताना गड, किल्ले बांधले पण त्याचबरोबर लोकांची मने ही जिंकली. त्यांचे विचार स्वातंत्र्याचे आणि आत्मनिर्भरतेची दिशा दाखविणारे मार्ग आहेत. महाराजांचे विचार हे आपल्या महाराष्ट्र व देशापुरते नव्हते तर संपूर्ण मानव जातीसाठी आदर्श होते. त्यांचा आदर्श हा जगभर घेतला जातो, महाराजांच्या राज्याचा कारभार कशा पध्दतीने चालत होता त्या पध्दतीने राज्यकारभार आजही अनेक देश चालविण्याचा प्रयत्न करतात एवढे मोठे महात्मे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे त्यांनी सांगितले. आपले राज्य शासन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवरच पुढे जात आहे. ग्रामविकास विभाग तसेच जिल्हा परिषद हे केवळ पायाभूत सुविधा किंवा योजना राबवणारी यंत्रणा नाही तर तो एक लोकसहभाग व लोकांच्या स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा लोकशाहीचा पाळणा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच गाव तिथे योजना, गाव तिथे प्रगती ही संकल्पना घेऊन पुढे जायचे आहे. सर्वांनी आपले गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मनात ठेवुन आपण एकत्र येऊन गाव, तालुका, जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले.