साडे 5 किलो सोन्यापैकी 32 तोळेच रिकव्हर:बाकी सोने गेले कुठे? वाळूज दरोडा प्रकरणी मंत्री शिरसाटांनी थेट गाठले आयुक्तालय

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात उद्योगपतीच्या घरावर दरोडा पडला होता. या प्रकरणात 26 मे रोजी एका संशयित आरोपीचा एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यानंतर संशयित आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने आणि वडिलांनी पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी देखील उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यात पोलिस देखील सहभागी असतात, असे विधान केले होते. त्यानंतर या दरोड्याप्रकरणी माहिती घेण्यासाठी संजय शिरसाट यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. वाळूजच्या उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यात साडेपाच किलो सोन्यापैकी 32 तोळे सोने रिकव्हर झाले, बाकी सोने कुठे गेले असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, आज मी पोलिस आयुक्तांकडे शहरातील गुन्हेगारीवर बोलण्यासाठी आढावा बैठक घेतली. शहरात जो मोठा दरोडा पडला होता. त्यानंतर एक एन्काऊंटर झाला. यानंतर अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न आहे हे एन्काऊंटर का केला? या सगळ्या प्रकाराचे तपशील घेतले आहेत. एन्काऊंटर झालेल्या आरोपीवर दहा गुन्ह्यांची नोंद आहे. यातील दुसऱ्या आरोपीवर 11 गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांच्या अंगावर गाडी घालणे हा प्रकार नवीन नाही त्यामुळे त्या संदर्भातल्या गुन्ह्यांची ही नोंद आहे. पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात शंका अशी आहे की दरोड्यातील पाच साडेपाच किलोमधील 32 तोळे रिकव्हर झाले मात्र उर्वरित सोने गेले कुठे? याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे. यात आणखी आरोपी पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण विषयाचा तपास करताना कोणताही दबाव आला तर त्याकडे लक्ष देऊ नका अशा सूचना केल्या आहेत. तुमच्या बाजूने नागरिकांना विश्वासार्ह माहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्या पद्धतीने काम करा यामध्ये सरकारचे पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.