संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस:ते जिथे जातात तिथे सगळे संपते, गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला

संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे, ते जिथे जातील तिथे सगळे संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्याचे आव्हान देत संजय राऊत जळगावमध्ये आले होते. परंतु त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते, ते एकही आमदार पाडू शकले नाहीत, असे गुलाबराव पाटील म्हणाले. संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस गुलाबराव पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीत आता संजय राऊत काय करतील असा प्रश्न आहे. संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे. ते जिथे जातील तिथे सगळे संपत जाते. विधानसभेच्या निवडणुकीत ते ज्यांच्या आजूबाजूला होते, ते सुद्धा त्यांच्यावर नाराज होते. यांच्याकडे कोणीही बघायला तयार नाही. ते जसे आले तसेच महानगर पालिकेच्या निवडणुकीत देखील माघारी जातील, असे पाटील म्हणाले आहेत. तसेच आगे आगे देखो होता है क्या असेही ते म्हणाले. सुरेशदादांना सध्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या निवडणुका लढण्याचा आमचा विचार आहे. पण जशा निवडणुका जवळ येतील तस तशी आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती देऊ. सुरेशदादा जैन यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले, सुरेशदादा जैन यांनी सागळ्या गोष्टीमधील राजकारण सोडून दिलं आहे. जे लोक चांगले काम करत आहेत, त्यांच्या पाठिशी सुरेशदादा जैन राहतात. संजय राऊत कितीही लाड-लबाड्या करायला गेले तरी काही परिणाम होणार नाही. सुरेशदादांना सध्या राजकारणाशी काही देणेघेणे नाही. सुरेशदादा जैन हे सगळ्यांसाठी ज्येष्ठ आहेत. आमच्यासाठी देखील ते ज्येष्ठ आहेत, असे पाटील म्हणाले. मंत्री प्रताप सरनाईकांच्या विधानावर काय म्हणाले गुलाबराव पाटील? दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदीबाबत केलेल्या विधानवरून राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, मराठी हा आमच्यासाठी अस्मितेचा भाग आहे. मराठी बोलली पाहिजे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. सरनाईक यांनी त्यांचा विचार मांडला असेल, असे ते म्हणाले. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना मला काही माहीत नसल्याचे गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे.