संजय राऊत यांनी सीमेवर देशाची सेवा करावी:त्यांना महाराष्ट्रात काहीही काम नाही; एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा खोचक सल्ला

भारतीय सैनिकांच्या वतीने राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात देशभरातून आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या ऑपरेशन संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांना खोचक सल्ला दिला आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्रात काही काम नाही. त्यामुळे त्यांनी सीमेवर जाऊन देशाची सेवा करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. या संदर्भात वृत्त संस्थेची बोलताना प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूरला देशभरातून पाठिंबा देण्यात आला आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहयोगी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे देशाची बाजू मांडण्यासाठी विदेशात देखील गेल्या आहेत. मात्र, असे असताना संजय राऊत यांना भारतीय सैनिकांना विश्वास नसेल तर त्यांनी सिमेवर जाऊन देशाची सेवा करावी, असे आव्हान सरनाईक यांनी दिले आहे. सुप्रिया सुळे यांनीही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विधानावर मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “संजय राऊत वगळता देशभरात कोणीही ऑपरेशन सिंदूर विरोधात बोलत नाही. त्यांच्या सहयोगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांना माझा संदेश आहे की, जर त्यांना आमच्या सैनिकांवर विश्वास नसेल तर त्यांनी स्वतः सीमेवर जाऊन देशाची सेवा करावी…” तुम्ही राजकारणासाठी हे घडवत आहात का? संजय राऊतांनी उपस्थित केला होता प्रश्न या संदर्भात राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत ऑपरेशन सिदूरवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ऑपरेशन सिंदूर हा जर भाजपचा प्रचाराचा अजेंडा असेल, तर हा अपप्रचार आहे. याचा अर्थ पुलवामा मध्ये आम्हाला संशय येत होता. की त्याचे राजकारण केले. आता पहलगाम हल्ल्याचेही राजकारण केले जात आहे. असा संशय लोकांना येत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. जर तुम्ही हे राजकारणासाठी वापरत असाल तर तुम्ही राजकारणासाठी हे घडवत आहात का? हा स्पष्ट संकेत प्रधान मंत्र्यांच्या कृतीतून दिसतो, हे देशासाठी योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.