वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला:जयंत नारळीकरांच्या निधनावर महाराष्ट्र हळहळला; ज्ञानवृक्ष उन्मळून पडल्याची भावना

विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींनी नारळीकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या सर्वांनी नारळीकरांच्या निधनामुळे देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त केली आहे. नारळीकरांनी ‘बिगबँग’ थेअरी का नाकारली?:विश्व हे कोणतीही सुरुवात अन् अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले असल्याचा केला होता दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले. खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती. पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे ते म्हणाले. वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला – अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत नारळीकर यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळला अशी भावूक भावना व्यक्त केली आहे. ते आपल्या शोकसंदेशात म्हणाले, जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनानं ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसंच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिक विज्ञान, खगोल विज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’संदर्भातील त्यांचं संशोधन मैलाचं दगड ठरलं आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मान-सन्मानानं गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचं निधन ही देशाची कधीही न भरून येणारी हानी आहे. त्यांनी सुरु केलेलं विज्ञानप्रसाराचं कार्य पुढे सुरु ठेवणं, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. एक मौल्यवान मोहरा हरपला -एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नारळीकरांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान मोहरा हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ, माणूस, सृष्टी आणि विज्ञान यांच्यातील नात्याचा संवेदनशील धागा आणि संवेदनशील साहित्यिक-लेखक पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान मोहरा हरपला आहे. आपल्या अनोख्या आणि सोप्या संवादशैलीतील लेखनातून सामान्य माणसाला विज्ञानाचे ज्ञान देणारे डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते. केवळ भूगोलच नव्हे, तर अवघ्या खगोलाची ओळख करून घेण्याच्या आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या अखंड ध्यासाने पछाडलेल्या डॉ.नारळीकर यांनी आपले संपूर्ण जीवन संशोधनासाठी समर्पित केले. विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्वयंसिद्ध मार्गदर्शक या नात्याने त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र संपन्न झाला. पुणे येथे त्यांनी स्थापन केलेल्या आंतरविश्व विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राने विज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांचे योगदान, ज्ञानदान आणि समर्पित संशोधनवृत्ती हा भावी पिढ्यांसाठी सदैव आदर्श राहील. डॉ. नारळीकर यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली, असे ते म्हणाले. ज्ञानवृक्ष उन्मळून पडला -चंद्रकांत पाटील राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारळीकरांच्या निधनामुळे देशाचा ज्ञानवृक्ष उन्मळून पडल्याची भावना व्यक्त केली आहे. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. विज्ञान विषयातला ज्ञानवृक्ष असेच नारळीकर यांचे वर्णन करावे लागेल. खगोलशास्त्रातील त्यांचे श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व जगमान्य आहे. रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहून त्यांनी विज्ञानासारखा रुक्ष विषय सुबोध केला. केंब्रीज विद्यापीठात शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम, आयुका संस्थेची उभारणी, २०२१ नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असा त्यांच्या कार्याचा आवाका होता. त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे देखील अपरिमित नुकसान आहे. नारळीकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना. ॐ शांति, असे ते म्हणाले. विज्ञानाच्या गगनातला तेजस्वी तारा हरपला – चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही नारळीकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने भारताने एक महान वैज्ञानिक आणि प्रेरणादायी लेखक गमावला आहे. त्यांनी विज्ञानाला लोकभाषेत आणलं आणि विज्ञानाची गोडी पिढ्यान्पिढ्या निर्माण केली. आयुका संस्थेची स्थापना, खगोलशास्त्रातील आंतरराष्ट्रीय कीर्ती आणि विज्ञानाच्या लोकाभिमुखतेसाठी त्यांनी केलेलं कार्य, या सर्वांमुळे ते भारतीय विज्ञानविश्वाचे एक अत्युच्च शिखर ठरले. त्यांचे कार्य आणि विचार आणि संशोधन येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली. हे ही वाचा… ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन:पुण्यातील राहत्या घरी 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; आकाशाशी नाते जडलेला तारा निखळला पुणे – भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांनी झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे एक थोर वैज्ञानिक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळल्याची भावना व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर