शरद पवारांच्या पक्षात जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी नाराजीचा सूर:सर्वच युवा नेते एकवटले; नाराजांमध्ये रोहित पवार, रोहित पाटील देखील

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी अलीकडच्या काळात अनेकदा नाराजीचे सूर उमटले आहेत. विशेषतः विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पक्षात अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच जयंत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना त्यांनी काही नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे पक्षातील तरुण नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराज तरुण नेत्यांमध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार रोहित पाटील यांचा देखील समावेश असल्याची चर्चा आहे. या नाराज नेत्यांनी त्यांची नाराजी थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे शरद पवार आता भाकरी फिरवणार का? ते नेमकी कोणती भूमिका घेतात, हे आता पहावे लागेल. तरुणांच्या नाराजीची पार्श्वभूमी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवानंतर काही नेत्यांनी अजित पवार गटातील नेत्यांशी जवळीक साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संदर्भात जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली आणि अशा नेत्यांना सुनावले. जयंत पाटील यांची भूमिका जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या “माझं काही खरं नाही” या विधानामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. तथापि, त्यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यांनी स्पष्ट केले की, “मी नाराज नाही. माझं वक्तव्य चुकीच्या संदर्भात घेतले गेले.” त्यांनी माध्यमांवर ही नाराजी व्यक्त केली होती की, “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला” पक्षातील अंतर्गत बदल पक्षात काही पदाधिकाऱ्यांनी रोहित पवार आणि रोहित पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पक्षातील काही प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या, ज्यामुळे पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला होता. आता पुन्हा अशीच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. अजित पवार यांच्यासोबत जाण्यात प्रदेशाध्यक्ष पद हा अडथळा? जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, ते शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत राहणार आहेत. त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना खोडून काढले आहे. तथापि, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाबाबतही चर्चा अद्याप सुरूच आहे. त्यात शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्यासोबत जाण्याचीही चर्चा सुरु आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष पद हा अडथळा ठरु शकतो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.