शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक पत्र:भाषणाचे कौतुक करत आभार मानले; महत्त्वाची मागणी देखील मांडली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच शरद पवार यांने नरेंद्र मोदींचे कौतुक देखील केले आहे. इतकेच नाही तर शरद पवार यांनी या पत्रामध्ये आपली एक मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार असल्याने त्यांनी पंतप्रधानांनी या संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहेत. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टी पूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले, असा उल्लेख देखील शरद पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे. सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. या साहित्य संमेलनाच्या मंचावरून दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेने हा प्रस्ताव मांडला होता. अनेक साहित्यिकांची ही मागणी असल्याचे यावेळी समोर आले आहे. वास्तविक पूर्ण आकाराचे घोडेस्वार पुतळे उभारले जावेत, अशी साहित्यिकांची मागणी आहे. मात्र हे स्टेडियम नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या या दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेकडून घ्यावा लागणार आहेत. या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अर्धाकृती पुतळा बसवला जावा, अशी मागणी केली होती. अनेक साहित्यिकांनी या संदर्भातील मागणी केली असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. साहित्यिकांची मागणी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंतर आता खासदार शरद पवार यांनी देखील या संदर्भात हस्तक्षेप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवले आहे.