शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक:5 ते 12 जूनपर्यंत मराठवाड्यात उभारणार शेतकऱ्यांचे जनआंदोलन, सरकारला विचारणार जाब

सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवत घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र आता सत्तेवर येऊन वर्ष उलटलं, तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नाही. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आता आक्रमक झाला आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी 5 जून ते 12 जून या कालावधीत मराठवाड्यात शेतकऱ्यांचे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनाचे शीर्षक “क्या हुआ तेरा वादा?” असे असणार आहे. या शीर्षकाखाली सरकारला जाब विचारून 5 जून ते 12 जून या कालावधीत हे आंदोलन उभारले जाणार आहे. आंदोलक शिवसैनिक शेतकऱ्यांचे प्रश्न, अपूर्ण योजना, अनुदान वितरणातील अन्याय, पीकविम्याची स्थिती यावर आवाज उठवणार आहेत. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ज्येष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. अंबादास दानवे काय म्हणाले?
राज्य शासनाने अवकाळी पावसाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानी संदर्भात अद्याप कोणतीही भरपाई दिलेली नाही. यावेळी सरकारने दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. या सरकारने जे जाहीर केले, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर एनडीआरएफच्या नियमानुसार दोन हेक्टर होती. आम्ही आता तीन हेक्टरला देऊ, जे निकष आहेत, त्यापेक्षा दीडपट देऊ, असे सरकारने सांगितले होते. मात्र, आता सरकारने यातून माघार घेतली आहे. सरकारने अजून जुनाच निधी दिलेला नाही. त्यावेळेत दोनचे तीन हेक्टर केले होते, त्याचाच निधी अजून दिलेला नाही. या सगळ्या विषयाला शिवसेना मराठवाड्यात 5 जूनपासून 12 जूनपर्यंत ‘क्या हुआ तेरा वादा’, यांनी शेतकऱ्यांना जे जे वादे केले होते, त्यासाठी आंदोलन पुकारत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात 72 तालुक्यांमध्ये 8 दिवस दररोज रणशिंग फुंकलेले आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.