शिंदे गटाच्या आमदाराची लाडकी बहीण योजनेवर टीका:म्हणाले- लोकांवर कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरा

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्याच आमदाराने घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. लोकांवर असा कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे. रायगड येथे माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. शिवरायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहेत. राजेंची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी 350 इमारती असलेला किल्ला कमी कालावधीत उभारला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना जर का दीर्घायुष्य लाभले असते तर देशात निजाम मुघल, पोर्तुगीज, कुतुबशाह हे कोणीच शिल्लक राहिले नसते. मराठ्यांनी पराक्रम करून संपूर्ण भारतभूमी 1750 पर्यंत मोघलरहीत केली. लाडकी बहीण योजनेवर टीका पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी किल्ल्यांवर येणाऱ्या तरुणांना सल्ला देताना म्हणाले, खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. गड किल्ल्यांवर आपल्या प्रेमिकेचे नाव आणि इतर विटंबना करणाऱ्या तरुणांनी तसे करू नये. गडकिल्ल्यांचे पुनर्वैभव प्राप्त होणे गरजेचे आहे. कोट्यवधीच्या योजना लोकांवर उधळण्यापेक्षा तेच पैसे राजांच्या गडकिल्ला संवर्धनासाठी वापरा, असा सल्ला देत त्यांनी अप्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेवरच टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लाखो करोडो महिलांची अब्रू कुंकू वाचवल त्या राजांचे किल्ले कधी तुम्ही सलामत ठेवणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले, एकत्र आल्यास काहीच फरक नाही पडणार. कारण आता वेळ निघून गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा मार्ग सोडून कॉंग्रेसचा मार्ग पकडल्याने मुंबईची जनता त्यांना स्वीकारेल का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.