शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने बोलून दाखवली खदखद:भास्कर जाधव म्हणाले- मी पात्र असताना 2019 च्या मंत्रिमंडळात मला घेतले गेले नाही

शिवसेना ठाकरे गटातील काही नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी देखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमाबाबत बोलताना, मी पात्र असताना 2019 च्या मंत्रिमंडळात मला घेतले गेले नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे. चिपळूणमधील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, 2019 च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवे होते, सर्वात जास्त जुना, सर्वाधिक वेळा निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता, पण मला घेतले नाही मात्र त्यानंतर मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, माझ्या पुढ्यातील ताट अनेकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, पण मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाच्या पुड्यातील ताठ ओढले नाही. पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे गद्दारी करतात ते महागद्दार आहेत. भास्कर जाधवांनी यावेळी बोलताना भाजपवरही सडकून टीका केली आहे. जाधव यांनी म्हटले की, भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढे प्रेम आहे तेवढे या देशामध्ये कुणालाच नाही. कर्नल सोफिया कुरेशी यांना भाजपचा नेता आतंकवाद्यांची बहीण म्हणतो. किती उलट्या काळजाचे लोक आहेत हे, तिथेही हिंदू मुस्लिम करतात. ते विंग कमांडर व्योमिका सिंगला असे का नाही बोलत? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. भास्कर जाधव यांनी भारत-पाकिस्तान तणावावरही भाष्य केले आहे. जाधव म्हणाले की, युद्धाबद्दलही बोलले पाहिजे. पण कुठले युद्ध आणि कुठले काय, काय सांगायचे त्याबद्दल, नाहीतर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील. यांना कोणी काही विचारले की हे म्हणतात तुम्ही पाकिस्तानचे समर्थक. भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढे प्रेम आहे तेवढे कुणालाच नाही. सकाळ-संध्याकाळ भाजपवाले पाकिस्तानचे नाव घेत असतात तेवढे कोणी घेत नाही. त्यामुळे यांच्यापासून देशाला वाचवायला हवे.