सामाजिक बंधनांवर मात करताना रात्रशाळेतील विद्यार्थिनींची भरारी:प्रा. शिरीष मोडक यांचे प्रतिपादन, रात्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अहिल्यानगर रात्रशाळेतील महिला विद्यार्थिनींनी उत्तम गुण मिळवणे ही साधी गोष्ट नाही. शिक्षणात मोठा खंड पडल्यावर पुन्हा अभ्यासाकडे वळणे, हा एक धाडसी निर्णय असतो. घरातील जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी, सामाजिक बंधनांवर मात करीत महिला स्वत:ची गुणवत्ता सिध्द करीत आहेत. शिक्षण घेण्याचा दृढ निश्चय केला जातो, तेव्हा यश निश्चित मिळते. या यशामागे केवळ विद्यार्थिनींचा दृढनिश्चय नाही, तर शिक्षकांनी दिलेले समर्पित मार्गदर्शनही तितकंच मोलाचं आहे. राज्यातील रात्रशाळेत टॉप टेनमध्ये चार विद्यार्थिनींचा समावेश असणे, हेच शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे यश असल्याचे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले. हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मासूम संस्था (मुंबई) यांच्या वतीने रात्रशाळांचे दहावीमधील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. राज्यातील टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये चार विद्यार्थी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे आहेत. दीक्षा गवळी-गायकवाड (८६.८०) हिने राज्यात प्रथम, मंदा भोराडे-पवार (७६.८०) यांनी राज्यात पाचवा, तर इशिता भोर व जयश्री वैरागर-वाघमारे (७४.४०) यांनी आठवा क्रमांक मिळवला. या गुणवंत विद्यार्थिनींचा संस्थेच्या वतीने भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक अजित बोरा, शालेय समितीच्या चेअरमन प्रा.ज्योती कुलकर्णी, डॉ. पारस कोठारी, नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे आदी उपस्थित होते. डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र शाळेत शिक्षक तळमळीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात. कठीण परिस्थितीतही गुरूंनी केलेले मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशामागचं खरं कारण असतं. म्हणूनच रात्र शाळेतील यश हे खऱ्या अर्थाने गुरूंचेच आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. तर बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी सारडा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन केले. बारावी परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे : कला शाखा प्रथम- स्वाती दुनंगू-गोंधळी (६५.५०), द्वितीय- प्रशांत भिसे (६२.५०), तृतीय- ऋतुजा दौंड-गवळी (६२.१७). वाणिज्य शाखा- प्रथम- वैशाली ओमासे-आंधळे (५६.५०), द्वितीय- मयुरी जाधव-कराळे (५२.३३), तृतीय- राकेश अष्टेकर (५०.३३). मासूम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निकिता केतकर, संचालक कमलाकर माने, युवराज बोराडे व एसएससी प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील यांचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन वैशाली दुराफे यांनी, तर अमोल कदम यांनी आभार मानले. भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षणातून घडते जीवन ज्योती कुलकर्णी म्हणाल्या की, शिक्षणाने नुसती डिग्री मिळत नाही, तर माणसाचे विचार प्रगल्भ होतात. विचार प्रगल्भ झाल्यास तुमच्या वागण्या-बोलण्यात बदल होतो आणि तो विचार तुम्हाला जीवनात पदोपदी निर्णय घेण्यास सक्षम बनवतो. शिक्षण फक्त नोकरीसाठी नसून, जीवन घडवण्याचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले.