सोमवारी 5, तर मे महिन्यात विदर्भ, मराठवाडा, उ.महाराष्ट्रात 20 बळी:संभाजीनगरसह मराठवाड्यात आज,उद्या मुसळधार, तर मुंबईत रेड अलर्ट

मे महिन्याच्या प्रारंभी महाराष्ट्रात आलेला अवकाळी पाऊस आता जवळपास मुक्कामी असल्यासारखाच आहे. कारण पुढील दहा दिवस म्हणजे ३१ मेपर्यंत राज्यभर विविध ठिकाणी पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, बीडसह मंगळवारी, बुधवारी (२०, २१ मे) मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, कोकणात याच दोन दिवसांत तर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. दरम्यान, सोमवारी (१९ मे) तुफानी वारा, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ५ जणांचा बळी घेतला. ५ ते १९ मे या कालावधीत किमान २० जणांनी जीव गमावला आहे. उत्तर, दक्षिण महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पिकांचे नुकसान झाले आहे. विजेने घेतले पाच जणांचे बळी : नाशिक, जालना जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) : गणेश प्रकाश जाधव, सचिन विलास बावस्कर या शेतकऱ्यांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. हिंगोलीत २ ठिकाणी वीज कोसळून २ बैल दगावले. नाशिक : सुकेणे (ता. निफाड) येथे दीपक रंगनाथ राहणे (३६) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. शहादा : आपल्या नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी तलावडी गावातून वडगाव आलेल्या सुखदेव दशरथ पावरा (३२) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला तर त्यांचा ७ वर्षीय मुलगा सुजित गंभीर जखमी झाला आहे. यवतमाळ : महागाव तालुक्यात पिंपळगाव येथे साेमवारी वीज पडून शेतात मजुरी करणाऱ्या विमलबाई किसन भिसे (३६) मरण पावल्या, तर उषा प्रल्हाद मेंडके गंभीर जखमी झाल्या. कशामुळे एवढा पाऊस अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागरात १७ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्तादरम्यान हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे तयार होऊन चक्रीय वारे उत्तरेकडे मार्गक्रमण करत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ बुधवारी हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार आहे. गुरुवारी त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे. याच्या प्रभावामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा मारा होणार आहे. रविवारी रात्री उशिरा, सोमवारी कुठे पाऊस? छत्रपती संभाजीनगर, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, रायगड, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, बीड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, जालना, जळगाव आदी जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. जीवितासह पिकांचे नुकसान झाले. महागाव तालुक्यात झाड काेसळल्याने कारचे नुकसान झाले. पाऊस महाराष्ट्रव्यापी हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, २१ ते ३१ पर्यंत मुंबईसह कोकणात जोरदार ते अति जोरदार, विदर्भातील ११ जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या १८ जिल्ह्यांतही पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तर मुसळधार पाऊस होऊ शकतो,