राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या:कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; धाराशिवमध्ये पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची नियुक्ती

राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या:कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; धाराशिवमध्ये पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची नियुक्ती

राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करत 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे काही ठिकाणी नवीन नेमणुकीची चर्चा रंगली आहे, तर काही बदल्यांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साताऱ्याचे एसपी समीर शेख यांची बदली बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. दरम्यान, रायगडच्या पोलिस अधीक्षकपदावरून अचानक करण्यात आलेल्या बदल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली करून त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पुणे पोलिस दलाच्या गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची रायगड एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे राज्यात सुरक्षा यंत्रणेत हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात आणखी काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. नवीन नियुक्त झालेल्या रितू खोकर यांच्यासमोर तुळजापूरमधील अलीकडील ड्रग्ज प्रकरणासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, माजी एसपी संजय जाधव यांना अद्याप कोणतीही नवीन नियुक्ती मिळालेली नाही. त्यांना स्वतंत्रपणे नवीन जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या बदल्यांमुळे धाराशिव जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात होत आहे. बीड पोलिस दलात 600 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बदल्या बीड पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलिस उपनिरीक्षक अशा 600 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली असून आता येत्या महिनाभरात हे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होतील. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यावर येथील पोलिस प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी एकाच पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध होते, त्यामुळेच बीडमध्ये गुन्हेगारी इतकी वाढली असल्याचे बोलले जात होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment