सुषमा अंधारेंचे भावनिक पत्र:कार्यकर्त्यांच्या जीवनातील कटू वास्तव मांडले, मंगेशकर रुग्णालयावरही व्यक्त केली नाराजी

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सर्व राजकीय कार्यकर्त्यां आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी फक्त तनिषा भिसे यांच्या मृत्युमुळे होणाऱ्या वेदनेचेच नाही, तर कार्यकर्त्यांच्या जीवनातील कडवे सत्यदेखील मांडले आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशीलता आणि निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या आमदाराच्या कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत अशी स्थिती निर्माण झाली असती, तर तत्काळ त्या व्यवस्थेने काम केले असते. मात्र, कार्यकर्त्यांच्या बाबतीत असे काही होत नाही, हेच कठोर सत्य आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना चर्चेचा विषय बनली आहे, गर्भवती महिला तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या उपचारांसाठी दहा लाख रुपये भरले नाहीत म्हणून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले नाहीत. या कारणावरून रुग्णालयावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. सुषमा अंधारेंचे पत्र जशास तसे…. प्रिय कार्यकर्ता दादा / ताई गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्याला लिहावं बोलावं असं फार आतून वाटत आहे. पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं वाटतंय.. दोन-तीन वेळा तर लिहून पुन्हा सगळं खोडून टाकावं असं वाटलं.. पण हे लिहिलं पाहिजे बोलल पाहिजे. काल परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिने जीव गमावला. मातृत्वाची अनिवार ओढ दुःखद करुणकथेमध्ये विसावली. रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का यावर शंकाच आहे. रुग्णालयाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली. सरकारही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहायता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला. नेमलेले आयोग समित्या चहा बिस्किटांपुरत्या असे सिमित राहतील. आजवरच्या कुठल्याही आयोग किंवा समितीने सरकारी यंत्रणेला दोषी धरलेलं नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही. अजून आठ पंधरा दिवसात रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबांधे यामध्ये मानवी जीवाचा कोलाहल विरून जाईल. असमेदनशीलता हलगर्जीपणा दप्तर दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागे पडतील. पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील. मुळात हा जीव का गेला. दहा लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की 80 कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते. अशा रेशनिंगचा धान्य करणाऱ्या जनतेला एका प्रसुतीसाठी 10 ते 20 लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का? सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वियसहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी ? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा चा मृत्यू हे एक निमित्त आहे. पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता दिवस-रात्र पळत असतो. नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा करत नाही आपली बायका मुलं रस्त्यावर येतील का.. त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का ? आरोग्य , शिक्षण, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का ? याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढााऱ्यांच्या मागे उर फुटेस्तोर, धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला खरंच असते का ? खरंच एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कुठल्यातरी योजनेमध्ये बसवता येते का किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का यासाठी धडपडत राहिले असते की, रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल पण आत्ता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता.. मला जर माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी 24/7 घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल. आणि त्याच्या कुटुंबाप्रति माझ्या जबाबदारीचा मला भान नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर.. !!! सोलापूरचे निर्मला यादव भाजपच्याच एका विंगमध्ये काम करायच्या. मात्र आज त्यांची अवस्था मृत्यूपेक्षाही भयंकर होण्याला कोण कारणीभूत आहे? ज्या पक्षासाठी दिवस रात्र जीव झिजवला ती लोक मदतीला पुढे का आली नाही? संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांच्या हत्येशी संबंधित सगळे पुरावे ग्रह खात्याच्या हाताशी असताना सुद्धा गृह खात्याने ते पुरावे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी तीन महिने दडवून ठेवले आणि मराठा ओबीसी तणाव वाढवला. कार्यकर्त्याच्या जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्त्वाचा वाटला. उदगीर मध्ये नोकरी करत होते. पन्नाशीच्या पुढचे दोन-तीन जेष्ठ कार्यकर्ते नित्य नियमाने येता जाता बस स्टैंड वर भेटायचे. कधी कधी चहा व्हायचा. मग ते गप्पांमध्ये बोलायचे. अमक्या ला आमदार कुणी केलं आम्ही केलं.. तमक्या विधान परिषदेवर कुणामुळे गेला आमच्यामुळे…!! मला फार आश्चर्य वाटायचं एवढ्या लोकांना आमदार करणारी ही माणसं अशी हिनदीन अवस्थेत का दिसत असतील. एखाद्या नेत्यासोबत त्याचा कार्यकर्ता किंवा हरकाम्या म्हणून रेल्वेने जनरल डब्यात प्रवास करत मुंबईला निघायचं. शबनम मध्ये एखादा स्टार्च करून ठेवलेला ड्रेस. रेल्वेतून उतरलं की कुठल्यातरी सुलभ शौचालय मध्ये फ्रेश व्हायचं. स्टार्चचे कपडे घालायचे. दिवसभर त्या नेत्याची बॅग घेऊन किंवा त्याचे वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढत त्याच्या मागे फिरायचं. संध्याकाळी पुन्हा सुलभ शौचालय गाठायचं स्टार्च चे कपडे पिशवीत ठेवायचे. चूरगळलेला ड्रेस अंगावर घालायचा. रेल्वेत बसण्याआधी इंग्रजी पेपर घ्यायचा. इंग्रजीत का तर याच्यात पाने जास्त असतात. समजा रेल्वे जागा नाहीच मिळाली तर खाली अंथरायची सोय पेपर मुळे होईल..! हे वाचायला कडवट आहे वाईट आहे पण सत्य आहे. जगाला साम्यवादाचा तत्त्वज्ञान सांगणारा मार्क्स सुद्धा अत्यंत हलाखीच्या अवस्थेत त्याचा शेवट झाला. त्याच्या पक्षात त्याचे पुस्तक फ्रेडरिक एंजल्स या त्याच्या मित्राने प्रकाशित केली. एखाद्या नेत्याचा लेफ्ट हॅन्ड राईट हॅन्ड, निकटवर्तीय, सावली, अशी विशेषणे लावून फिरणारा कार्यकर्ता खरंच संकट काळात त्याच्या मदतीला कोणी नेता येतो का ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचे दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रकल्भ होत नाही. नेत्याने नुसता पाठीवर हात टाकला की फुरफुरणारे कार्यकर्ते, नेत्यांनी आपल्याला चारचौघात ओळखीच्या आवाजाने हाक मारली याने हरखून जाणारे, नेत्यासाठी सोशल मीडियात बाजू मांडून स्वतःवर केसेस ओढवून घेणारे दादाहो हे सगळं करण्याच्या आधी तुमच्या कुटुंबाचा विचार करा. तुमच्या आपत्कालीन स्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही सोबत असणार नाही याच भान असू द्या. नेत्याच्या सांगण्यावरून माती भडकवून दंगलींमध्ये सामील होणारे उद्या कोर्टकचेऱ्यांमध्ये जमातीसाठी कागदपत्रांची जमवाजमव करायला तुमच्या घरातली वृद्ध आई, 10 ते 5 च्या शिफ्ट काबाडकष्ट करणारा भाऊ, गेलातच तुम्ही तुरुंगात तर धुणीनी भांडी करून तुमच्या चिलापिलांना सांभाळणारी तुमची बायको याच्याशिवाय दुसरा कोणीही मदतीला येणार नाही. तेव्हा या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आपले अर्थकारण सक्षम करण्याकडे लक्ष देणे अधिक चांगले. छत्रपती शिवराय एखादा गड किल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे मग त्यांच्या मागे मावळे यायचे. कार्यकर्त्याला सांगण्याच्या आधी जो स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो अशा नेत्यासोबत उभे राहायला हरकत नाही. मात्र “तुम लढो हम कपडे सांभालते हैं” या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा. जो दुसऱ्या वरी विसंबला.. त्याचा कार्यभार संपला…