स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे आज कुठे आहेत?:मॉन्सूनपूर्वीच्या बैठका महापालिकेने घेतल्या नाहीत, मुंबईच्या पावसावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पहिल्याच पावसात मुंबई तसेच पुण्यात अनेक भागांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये पाणी साचण्याची समस्या नवीन नाही. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी भुयारी मेट्रोची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे आज कुठे आहेत? आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले की पहिल्याच पावसात मुंबईची झालेली दैना यावर काय म्हणाल, यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतला हा पहिला पाऊस नाही. मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला. आपल्याला आठवत असेल साकीनाकाचे काय हाल झाले होते. मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला त्यावेळी अंधेरी सबवे पूर्ण पाण्यात गेला होता. मुंबईतला हा आता चौथा किंवा पाचवा पाऊस आहे. गेले दोन महीने आम्ही सातत्याने सांगत आहोत की नालेसफाई नीट झालेली नाही. दोन महीने झाले आम्ही सांगत आहोत की मॉन्सूनपूर्वीच्या बैठका ज्या घ्यायच्या होत्या त्या महापालिकेने घेतल्या नाहीत. स्वतःला जे इन्फ्रामॅन बोलणारे, स्वतःला व्हीजनरी बोलणारे आज कुठे आहेत? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ग्रीन कार्पेट घालून जे नालेसफाई बघायला जात होते ते आता कुठे आहेत? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी खाल्लेला पैसा हा नगरसेवकांना फोडण्यात जात आहे, पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे. पण हा पैसा मुंबईकरांचा आहे. आज जे हाल झाले, त्यातून काढलेला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईकर भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाहीत दोन आठवड्यांपूर्वी मेट्रो 3 च उद्घाटन झाले. तिथे आत जाऊन देत नाहीत. इमर्जन्सीसारखी स्थिती आहे. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे, ते पहा, अशी टीका आदित्य यांनी केली. हिंदमाता परिसर 2022 साली आम्ही पूरमुक्त केला होता. हिंदमाता पूर नियंत्रण योजना आणलेली. त्या हिंदमाता परिसरात आज पाणी साचलं आहे. भाजपची केंद्रात, राज्यात मागच्या 10 वर्षांपासून सत्ता आहे. सर्व यंत्रणा सीएम ऑफिस आणि नगरविकास खात्यातून चालतात. त्या किती निक्क्म्या आणि भ्रष्ट आहेत ते दिसतय. मुंबईकर भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.