ठाण्याच्या टेंभी नाक्यावर शिवसैनिकांवर चॉपरने हल्ला:शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घडला प्रकार; घटना CCTV कैद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात शिवसैनिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 शिवसैनिक जखमी झाले असून, त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. मारहाणीची संपूर्ण घटना तेथील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोकाटे यांनी याचा जाब विचारल्यानंतर आफ्रिन नामक महिलेने आपल्या 3 सहकाऱ्यांसह कोकाटे यांच्या 2 कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या घटनेत हे दोघेही जबर जखमी झालेत. टेंभीनाका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्याच ठिकाणी ही घटना घडल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी शिवसैनिकांना लगतच्या रुग्णालयात दाखल केले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी ठाने नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आफ्रिन व तिच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. भावावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हल्ला यासंबंधीच्या माहितीनुसार, आफ्रिनचा भाऊ सोहेल खान याच्यावर गत शनिवारी हल्ला झाला होता. नवपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या तीन पेट्रोल पंप येथे हा प्रकार घडला होता. त्यात सोहेल गंभीर जखमी झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आफ्रिन आपल्या सहकाऱ्यांसह हातात चाकू व चॉपर घेऊन सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयात पोहोचली होती. तिने काही एक कळण्याच्या आत कार्यालयात बसलेल्या शिवसैनिकांवर चॉपरने हल्ला चढवला. त्यात 2 जण गंभीर जखमी झाले. हे ही वाचा… फडणवीस, मिंधे… भुजबळांच्या मांडीचे काय करणार?:ठाकरे गटाचा सवाल; शिंदेंना अमित शहांच्या दारात जाऊन हैदौस घालण्याचा सल्ला मुंबई – छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे कनिष्ठ एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवील आहे. भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने फक्त भुजबळांची नव्हे, तर इतर अनेकांची शोकांतिका झाली. फडणवीस, एकनाथ मिंधे यांचे भुजबळांच्या मांडीशी वैर होते. मंत्रिमंडळात भुजबळांची ‘मांडी’ नको हा त्यांचा पण होता. मात्र आता भुजबळांची मंत्रिमंडळात एण्ट्री झाली आहे. त्यामुळे स्वतःची मांडी खाजविण्याऐवजी यापुढे या दोघांना भुजबळांची मांडी खाजवावी लागेल, असे ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. वाचा सविस्तर