ठाकरे बंधू युती झाल्यास भाजपला आव्हान निर्माण होणार का?:राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले- भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष..

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाढू लागली आहे. अलीकडेच माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ.” त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या शक्यतांना आणखी पंख फुटले आहेत. या घडामोडींवर आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ठाकरे बंधूंच्या युतीचे भाजपला काही आव्हान वाटते का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. कोणी एकत्र येण्याने आव्हान निर्माण होत आहे असे कोणी म्हणत असेल तर तो कल्पना विलास आहे, असे म्हटले आहे. हे राजकारण करण्याचे ठिकाण नाही मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात प्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरू केले आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, कोणतीही दुर्घटना दुःखद असते, हे राजकारण करण्याचे ठिकाण नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हा चौकशीचा भाग आहे. मात्र, विरोधकांकडे कोणत्याही गोष्टी शिल्लक नसल्याने ते राजकारण करत आहेत. तसेच माझ्यासारखा कार्यकर्त्याला दुःखद वेदना होतात आणि चीड येत आहे. या घटनेच्या चौकशीनंतर भाष्य करणे योग्य राहील. अशा घटना घडायला नकोत. रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्याने विशेष काळजी घ्यायला हवी होती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अहिल्यानगर तालुक्यातील काही भागात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत आणि अद्याप मदत देखील मिळाली नाही. अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसान नियमात बसून तातडीने मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून लवकरात लवकर मदत मिळेल, असे आश्वासन विखे पाटलांनी दिले आहे. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, अतिवृष्टी झालेल्या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले असून माझा मतदारसंघ असलेल्या राहाता तालुक्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत. ज्या गोष्टी नुकसानीमध्ये बसत नाहीत. मात्र नुकसान झाले आहे, अशा गोष्टी देखील कशा बसवता येतील? यासाठी आम्ही प्रयत्न करत असून लवकरात लवकर मदत मिळेल.