तुम्ही 1 पाऊल पुढे या, मनसे 100 पाऊले पुढे येईल:MNS नेते अविनाश जाधव यांचे विधान; मनसैनिकांची ठाकरे ब्रँड टिकवण्याची भावना

राज्यात मनसे – ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या चर्चेत उडी घेत ठाकरे गटासोबतच्या युतीच्या मुद्यावर केवळ एका फोनने मार्ग निघू शकतो असा दावा केला आहे. ठाकरे गटाने यासंबंधी एक पाऊल पुढे टाकले, तर राज ठाकरे 100 पाऊले पुढे टाकतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांच्या पक्षाच्या विभागप्रमुखांची आज शिवतीर्थावर बैठक झाली. या बैठकीत मनसैनिकांनी ठाकरे गटासोबत युती करण्याच्या मुद्यावर अनुकूलता दर्शवल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंधील फुटीमुळे ठिकठिकाणी परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, असे मत या सर्वांनी बैठकीत व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाने एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे 100 पाऊले पुढे टाकतील असे स्पष्ट केले. ..तर राज ठाकरे 100 पाऊले पुढे येतील युती प्रसार माध्यमांपुढे बोलून होत नसते. ठाकरे गटाला मनसेसोबत युती करावीशी वाटत असेल तर फक्त एक फोन केला की मार्ग निघू शकतो. त्यामुळे तुम्ही एक पाऊल पुढे आलात, तर मला राज ठाकरे साहेंबावर विश्वास आहे, ते 100 पाऊले पुढे येतील, असे ते म्हणाले. दुसरीकडे, मनसेच्या केंद्रीय समितीमधील पदाधिकारी संजय जामदार यांनीही यावेळी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकण्याची गरज व्यक्त केली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर ते म्हणाले की, आमची राज ठाकरेंसोबत बैठक झाली. राज्यात परप्रांतियांची दादागिरी वाढली आहे. राज्यात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. दोन भावांमध्ये फूट असल्याने किरीट सोमय्या, कंगना राणावतसारख्यांची दादागिरी वाढल्याची राज्यातील जनतेची भावना आहे. याला दोन भावातील फूट कारणीभूत आहे. आता हे थांबले पाहिजे. राज ठाकरे यांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. संदीप देशपांडे यांची वेगळीच भूमिका तत्पूर्वी, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गट व मनसेत युतीची कोणतीही बोलणी सुरू नसल्याचे जोर देऊन स्पष्ट केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आणि मनसेमध्ये युती बाबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात युती बाबत चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा केवळ नेत्यांमध्ये होत आहे. रोज सकाळी कोणता भोंगा या बाबत बोलतो. त्यांच्याकडेच युतीचा प्रस्ताव तयार असेल, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने युतीसाठी कोणताही प्रस्ताव तयार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मनसे सोबत युती करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेतला असून पक्षाचे नेते वारंवार युती बाबत वक्तव्य करत आहेत. दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल – संजय राऊत युती बाबत संजय राऊत यांनी देखील आजच वक्तव्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. त्यामुळे युती विषयी चर्चा करायची असेल, तर त्यांनी एकमेकांना फोन करावा, असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. अमित ठाकरे हा गोड मुलगा आहे. त्याच्या जन्मापासून मी त्याला पाहतोय. त्याचा काका म्हणून त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या दोघांच्या युती बाबत तुम्हाला फळ दिसेल. मी दहा मिनिटांनी फोन करतो, हे सांगून फोन करण्याची आवश्यकता नाही. त्या दोघांमध्ये फोनवर बोलणेही झाले असेल? तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल. काही दिवसात झाडाला फळे देखील येतील. त्यामुळे एवढ्या लवकर फळे कशी आली? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करतात, असे देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.