वैष्णवी हगवणे प्रकरणाची धुळ्यात पुनरावृत्ती:नवऱ्यानेच मारहाण करत हत्या केली, शारदाच्या कुटुंबीयांचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच अशीच घटना धुळ्यात घडली असल्याचे समोर आले आहे. धुळ्यातील वलवाडी गावात सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा बागुल हीची हत्या केली असल्याचा आरोप शारदाच्या नातेवाइकांनी केला आहे. शारदाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाला भडगाव येथे फोन आला व सांगितले की तुझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. बातमी कळताच माहेरचे मंडळी दाखल झाले. शारदाचा मृत्यू झाल्याचे समजताच माहेरची मंडळी गावात दाखल झाली. तेव्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी निघालेल्या सासरच्या मंडळींसोबत शाब्दिक वाद झाले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली व त्यानुसार पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. 2010 साली शारदा आणि कपिल यांचा विवाह झाला होता. त्यानंतर कपिल शारदाचा छळ करत होता. गेल्या वर्षी जळगाव येथील महिला आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. परंतु, महिला आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप शारदाच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच आता कपिल बागुल यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कपिल बागुल यांनी शारदाला मध्यरात्री मारहाण केली, त्यानंतर मुलगी चारवी व मुलगा चैतन्य दोघांना छत्रपती संभाजीनगर येथे नातेवाईकांकडे पाठवून देण्यात आले होते. दोन्ही मुलांचा ताबा आपल्याकडे देण्यात यावा, अशी मागणी शारदाच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर कपिल पळून गेला असून धुळे येथे एका खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याची प्रकृती ठीक असून तो नाटक करत असल्याचा आरोप शारदाच्या भावाने भूषण महाजन यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत कपिल बागुल याला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही शारदाचे अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा महाजन कुटुंबाने घेतला आहे. या संदर्भात पुढील कारवाई धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिस करत असून घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे.