ग्राम दरबार उपक्रमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावणार:तहसीलदार शारदा दळवी यांचे आश्वासन, कवठा येथे कार्यक्रम

विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या ग्राम दरबार या उपक्रमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी बुधवारी ता.१२ कवठा येथे दिले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून ग्रामदरबारचा कार्यक्रम वसमत तालुक्यातील कवठा येथे घेण्यात आला. यावेळी तहसीलदार शारदा दळवी, बाबुराव खराटे नायब तहसीलदार व्ही एम . डोणगावकर,गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील अंभुरे, गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. गवई, आरोग्य विभागाच्या डॉ.सावित्री होळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहा.प्रबंधक कृष्णा वाडीकर. सरपंच मंगला तुंबे, महिला बालकल्याण अधिकारी सारिका सोरेकर यांच्या सह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्राम दरबाराच्या माध्यमातून गावकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यात आले यावेळी बोलताना तहसीलदार दळवी म्हणाल्या की, ग्राम दरबार या उपक्रमामुळे गावकऱ्यांना त्यांच्या गावातच प्रशासकीय पातळीवरील प्रश्न मांडता येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित असल्यामुळे गावकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे शक्य होणार आहे. ग्राम दरबारात गावकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न मांडल्यास त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे शक्य होणार आहे. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी अभिनव गोयल, विभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः गावकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी गावकऱ्यांनी स्मशानभूमी च्या जागेचा प्रश्न त्याचबरोबर जलजीवन मिशनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली तसेच पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन बालय्या स्वामी यांनी केले. कार्यक्रमासाठी ग्राम महसूल अधिकारी सुधीर इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी डी के आजादे, चक्रधर खराटे यांनी पुढाकार घेतला.