वटकळीकरांचं शोले स्टाईल आंदोलन:जलजीवन मिशनच्या चौकशीसाठी ग्रामस्थ चढले पाण्याच्या टाकीवर

सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जल जीवन मिशनच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी गावकऱ्यांनी बुधवारी ता. 21 सकाळी जलकुंभावर जाऊन शोलेस्टाईल आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तातडीने एक पथक वटकळी कडे रवाना केले आहे. तर पोलिसांचे पथकही गावात दाखल झाले आहे. सेनगाव तालुक्यातील वटकळी हे 5000 लोकसंख्येचे गाव असून गावात नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. नळ पाणी पुरवठा योजनेचासाठी सुमारे तीन किलो मीटर अंतर असलेल्या दाताडा शिवारात विहीर घेतली आहे. या विहीरीला कमी पाणी असतांनाही जलवाहिन्या अंथरण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. केवळ अर्धाफुट खोलीवरच जलवाहिन्या अंथरण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी नांगरणी केल्यानंतर अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. या कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. त्यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी योजनेच्या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते शिवाय नळ योजनेची दुरुस्ती करून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जाईल असे लेखी दिले होते. मात्र चौकशीही झाली नाही अन नळ पाणी पुरवठा योजनेची दुरुस्तीही झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने गावकऱ्यांना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी माजी सरपंच देवराव शिंदे, गणेश डाखुरे, भारत शिंदे, वामन डाखुरे, दिनेश उबाळे, वैभव उबाळे, राजू उबाळे, जगन लेकुळे, शेषराव शिंदे, केशव शिंदे, नागेश सुरकुटे, शुभण हवनते, गजानन इटकर, सखाराम इटकर यांच्यासह गावकऱ्यांनी बुधवारी ता.21 जलकुंभावर जाऊन शोलेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तातडीने पाणी पुरवठा विभागाचे पथक वटकळी गावाकडे रवाना केले आहे. तर सेनगाव पोलिसांचे पथकही गावात दाखल झाले आहे. दुरुस्तीचे काम लवकरच सुरु करणार- सोळुंके ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल सोळुंके म्हणाले की, गावात नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये काही ठिकाणी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार दुरुस्तीचे काम लवकरच केले जाणार आहे. गावकऱ्यांना पिण्याचे पाणी देणे प्रथम प्राधान्य असणार आहे.