‘हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिये’चा निनादला सूर:”सिंदूर”च्या यशानंतर सन्मानार्थ नांदगाव पेठ येथे तिरंगा रॅली

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत सहभागी होऊन भारत माता की जय, जय हिंद, हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिये, अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष व अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, खा. डॉ. अनिल बोंडे, माजी खा. नवनीत राणा, माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, आ. प्रताप अडसड, आ. उमेश यावलकर, आ. राजेश वानखडे, किरण पातुरकर, जिल्हा तिरंगा यात्रेचे संयोजक राजेश्वरी निस्ताने, तात्यासाहेब मेश्राम, नरसिंग, सचिन इंगळे, अमित बाबुळकर, दिनेश सुंदरकर, अनुप भगत, मनोज खवळ, प्रवीण शेंदरकर अंकुश चौधरी, संतोष मटिया, मोरेश्वर मुळे, अमोल व्यवहारे तसेच जिल्ह्याच्या २१ मंडळातील तालुकाध्यक्षही उपस्थित होते. याप्रसंगी सचिन शेंदरकर, संतोष शेंदरकर, गणेश चापके व अन्य माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते. पहलगाम हल्ल्याचा वचपा घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर प्रहार केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या सैनिकांनी आपली शक्ती पणाला लावली, अशा सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या सन्मानार्थ नांदगाव पेठ तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. देशासाठी अहोरात्र झटणारे सैनिक आमची आण-बाण-शान आहे. त्यांच्या सन्मानासाठी आम्ही सदैव तत्पर असून देशाचा तिरंगा हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे या रॅलीमध्ये आम्ही फक्त देशाचा तिरंगा हाती घेऊन देशभक्तीची भावना जागृत करण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन या वेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले.