भैय्याजी जोशींना आपण मराठी आहोत याचे भान नाही का?:राज ठाकरे यांचे खडेबोल; म्हणाले – मराठी माणूस हे विसरणार नाही हे लक्षात ठेवा

भैय्याजी जोशींना आपण मराठी आहोत याचे भान नाही का?:राज ठाकरे यांचे खडेबोल; म्हणाले – मराठी माणूस हे विसरणार नाही हे लक्षात ठेवा

मराठी भाषेवर बोलताना भैय्याजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचे भान सोडावे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जोशीबुवांनी अशा काड्या करू नये, अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. इतकेच नाही तर या वक्तव्याचा भाजप निषेध करणार आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपला देखील आव्हान दिले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भाजप आणि भैय्याजी जोशी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत असल्याचे देखील ते म्हणाले. इतकेच नाही तर मराठी माणूस हे वाक्य कधीही विसरणार नाही, हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असल्याचा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं ! राज ठाकरे । जोशींचे नेमके वक्तव्य काय? भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, असे ते म्हणाले होते. यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment