राज्यात 15 जूननंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होणार:शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

राज्यात 15 जूननंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होणार:शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, पीक-पाणी आणि धरणातील पाणीसाठ्याचा सखोल आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी 15 जूननंतरच अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी बैठकीत राज्यातील पीक-पाणी, पेरण्या आणि खतपुरवठ्याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याच्या सर्व भागांत 15 जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईने पेरण्या करू नयेत. सध्या राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी, 12 जिल्ह्यांत 25 ते 50 टक्के, 4 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के आणि केवळ एका जिल्ह्यात 100 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरळीत असून, अनेक ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून सक्रीय होण्याची शक्यता वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी बैठकीत सांगितल्यानुसार, मान्सून येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे 12 आणि 15 जून दरम्यान मुसळधार तर 13, 14 जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती शुभांगी भुते यांनी दिली. नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन या कालावधीत हवामान विभागाने मच्छिमार बांधवांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये, झाडांखाली आसरा घेऊ नये, विजेची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत आणि पाणी असलेल्या स्त्रोतांपासून दूर राहावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रमुख धरणांतील पाणीसाठा समाधानकारक जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे ते म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment