सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही:पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला, भरत गोगावले समर्थक आमदार आक्रमक

सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही:पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला, भरत गोगावले समर्थक आमदार आक्रमक

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद हा आणखी विकोपाला जाताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र साळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराच दिला आहे. तसेच आता तटकरे यांच्या विरोधात एकच मोहीम सुरू झाली आहे ती म्हणजे तटकरे हटाव मोहीम, अशा शब्दात महेंद्र साळवी यांनी हल्लाबोल केला आहे. अलिबाग येथील कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यात प्रामुख्याने आमदार महेंद्र साळवी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार महेंद्र साळवी म्हणाले, एकनाथ शिंदेंसमोर आम्ही आमची कैफियत मांडली आहे. भरत गोगावले यांचे पालकमंत्रिपदाच्या रेस मधील नाव गायब होऊन आदिती तटकरे यांचे टाकण्यात आले. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्रिपद हे भरत गोगावलेनाच मिळायला हवे होते. मात्र तटकरे यांनी गोगावले यांचे नाव यादीतून हटवण्यासाठी त्यांची जादू चालवली. यादीतून नाव गायब करणे हा तटकरे यांचा स्वभाव आहे. सुनील तटकरे यांना गोगावले हे मंत्री झाले तर पालकमंत्री निश्चित होणार हे माहीत झाल्यानेच त्यांनी पालकमंत्री पद त्यांच्याकडे खेचून आणले. मात्र आमच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्थगिती आणली. आम्ही आता आशावादी आहोत की येणाऱ्या चार दिवसात भरत गोगावले पालकमंत्री होतील. सुनील तटकरे यांची झोळी फाटली पुढे बोलताना महेंद्र साळवी म्हणाले, भरत गोगावले यांचे नाव यादीतून वगळल्यानंतर रायगडमध्ये मोठा उठाव झाला. हा आमचा आणि लोकांचा उद्रेक आहे. गोगावले हे पालकमंत्री पदाचे दावेदार असतानासुद्धा तटकरेंनी आपल्या झोळीतच दान टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आता कधीच असे होणार नाही. कारण सुनील तटकरे यांची झोळी फाटली आहे. आता जे काही दान पडेल ते भरत गोगावले यांच्या झोळीतच पडेल. प्रदेशाध्यक्ष पदाचा वापर करून दबाव तंत्र वापरले सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना महेंद्र साळवी म्हणाले, सुनील तटकरे यांचा पूर्व इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा वापर करून दबाव तंत्र वापरले. त्यानी प्रोटोकॉलचे पालन केले नाही. तटकरे जरी पालकमंत्री पद खेचून आणण्यात यशस्वी झाले असले तरी ते येणाऱ्या काही दिवसात अयशस्वी ठरतील. आता कितीही काही झाले तरी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील. तटकरे हटाव मोहीम आमदार महेंद्र साळवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही सगळ्यांनी सुनील तटकरे यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केले होते. खरे तर सुनील तटकरे यांच्याबद्दल आमच्या मनात निगेटिव्हीटी होती. परंतु आम्ही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होऊन त्यांना निवडून दिले. परंतु नेहमीप्रमाणे सुनील तटकरे यांनी त्यांची रणनीती तयार करून आम्हाला दगा दिला. सुनील तटकरे यांनी आतापर्यंत लोकांना फसवण्याचाच धंदा केला. आता तटकरे यांच्या विरोधात एकच मोहीम सुरू झालेली आहे ती म्हणजे तटकरे हटाव मोहीम. येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment