[ad_1]

स्वप्निल एरंडोलकर, इस्लामपूर (सांगली) : आम्ही सत्तेला हापापलेली माणसे नाहीत, सत्ता येत असते सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन महायुतीत सामील झालो, असे स्पष्टीकरण देऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक म्हणून चांगले उमेदवार देऊ, असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. विरोधक सैरभैर पळत असल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही एक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला. अरविंद केजरीवाल यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत इस्लामपूरकर, वाळवाकरांनो आपला देश सव्वाशे कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा आहे. अनेक जातीचे लोक आहेत. त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. जगामध्ये देशाचे नाव गौरवाने घेतले पाहिजे. आपल्या पंतप्रधानांचा मान सन्मान परदेशात ठेवला जातो. सातत्याने ते जनतेशी संपर्कात असतात. त्यामुळे आम्हीही विचार केला. आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडमुठेपणाची भूमिका न घेता आम्ही महायुतीत सहभागी झालो. शेतकऱ्यांचे, गरीब घटक, वयोवृद्ध लोकांचे प्रश्न आम्ही सोडवत आहे. प्रत्येक गावात पक्ष मजबूत असला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं अजित पवार म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार आम्ही सोडलेला नाही. वाळवा हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. या तालुक्याने क्रांती केली आहे. शेवटी जमिनीवर पाय ठेऊनच काम करायचं असतं. सर्व सामान्यांच्या मदतीला धावले पाहिजे. इस्लामपूरमध्ये पहिल्या मजल्यावर आमच्या पक्षाचे कार्यालय आहे. केदार पाटील यांच्या प्रयत्नातून सुरुवात याठिकाणी हे कार्यालय झालं आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. शेतकरी हीच आमची जात आहे. शेतकऱ्यांच्या पोटीच आम्ही जन्मलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला कळतात. बाजारपेठेला उर्जितावस्था देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मी राज्याचा अर्थमंत्री आहे, त्यामुळे आपण काळजी करू नका, असेही त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *