[ad_1]

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष हा आरक्षणाचा जन्मजात विरोधक आहे. काँग्रेसला कोणतंही आरक्षण पसंत नाही, असं पंडित नेहरू यांनी पत्रात म्हटलं आहे. बाबासाहेबांचे विचार संपविण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न झाले. अगदी काँग्रेस पक्ष बाबासाहेबांना भारतरत्न देऊ शकलं नाही. भाजपच्या समर्थनाने बनलेल्या सरकारकडून बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला. काँग्रेसने पूर्ण ओबीसींना देखील आरक्षण दिलं नाही. गरीब-मागास-आदिवासी यांची काँग्रेस कायमच विरोधक राहिलेली आहे. बाबासाहेब नसते तर एससी एसटी प्रवर्गाला आरक्षण मिळालं नसतं. सामाजिक न्यायाच्या विरोधात असलेली काँग्रेस आज आम्हाला सामाजिक न्याय धोरण सांगत आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाचा विरोध केला म्हणूनच सामाजिक न्यायाला ‘मोदी कवच’ दिलंय, अशी सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. तसेच मोदी ३.० पर्व आता फार दूर नाही असे सांगताना एनडीए सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत येईल, असा दृढविश्वास मोदींनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. आजही त्यांनी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही काँग्रेसच्या इथून मागच्या सरकारांवर हल्ला चढविला. भूतकाळातील काँग्रेस सरकारच्या धोरणांवरून त्यांनी गांधी-नेहरू घराण्याला लक्ष्य केलं.

काँग्रेस विचारांनी देखील आऊटडेटेड

काँग्रेसचा जन्म कसा झाला? असा सवाल उपस्थित करतानाच इंग्रजांपासून प्रेरणा कुणी घेतली? स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसने गुलामी मानसिकता दाखवली, इंग्रजांची दंडसंहिता का बदलली नाही? असे एकामागून एक सवाल नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला विचारले. २१ व्या शतकात जगत असताना २० व्या शतकातली मानसिकता घेऊन काँग्रेस चालत आहे. काँग्रेस विचारांनी देखील आऊटडेटेड झालीये. काँग्रेसला मेहनतीची आवश्यकता आहे, असे टोमणे मोदींनी लगावले.

आदिवासी महिला राष्ट्रपती होणं याला काँग्रेसचा विरोध होता

आदिवासी महिला राष्ट्रपती होणं याला काँग्रेसचा विरोध होता. भाजपने प्रथमच आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं. सीताराम केसरींवर काँग्रेसने काय अन्याय केले, हे सर्वांसमोर आहे. काँग्रेसने कायमच एससी एसटी ओबीसींना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी त्यांची अवहेलना केली, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

काँग्रेसचा एखाद्या संस्थेला हात लागला की ती संस्था बंद झालीच म्हणून समजा

मी स्वतंत्र भारतात जन्मलो तर माझी स्वप्ने देखील स्वतंत्र आहेत, पण काँग्रेसला हे कळत नाही. बीएसएनएल एमटीएनएल बर्बाद करणारी काँग्रेसच होती, एअर इंडियाची दुर्दशा कुणी केली? एलआयसीबाबतही काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली परंतु आज एलआयसीचे शेअर विक्रमी उंचीवर आहेत. काँग्रेसचा एखाद्या संस्थेला हात लागला की ती संस्था बंद झालीच म्हणून समजा. सरकारी कंपन्यांच्या परताव्यांत १.२५ लाख कोटींची वाढ झाली आहे. इतकं असूनही काँग्रेस आमच्या धोरणांवर टीका करते, असं मोदी म्हणाले.

यूपीए सरकारच्या काळात गुजरातला मागे खेचण्याचे प्रयत्न झाले

प्रादेशिक आकांक्षांचं महत्त्व शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांना कळतं. यूपीए सरकारच्या काळात गुजरातला मागे खेचण्याचे प्रयत्न झाले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला केंद्रीय मंत्री वेळ देत नव्हते. मुख्यमंत्री असताना मी खूप उपेक्षा सहन केली. देशाच्या राजकारणात राज्यांचं योगदान महत्त्वाचं आहे हे काँग्रेसने लक्षात घ्यायला हवं, असंही मोदी म्हणाले.

आमची तिसरी टर्म आता फार दूर नाही

“सब का साथ- सब का विकास हीच मोदी गॅरंटी आहे. ८० टक्के सवलतीचं औषध म्हणजे मोदींची गॅरेंटी आहे. आमची तिसरी टर्म आता फार दूर नाही. तिसऱ्या कार्यकाळातील सरकारध्ये विकासाचा पाया अधिक भक्कम करू. पुढील पाच वर्षांत सगळ्या घरात ‘नल से जल’ दिलं जाईल. देशभरात पाईपने गॅस पोहोचेल. येणाऱ्या पाच वर्षात देशात लाखो स्टार्ट अप सुरू होतील, अशी आश्वासने मोदींनी निवडणुकीआधी राज्यसभेत बोलताना दिली”

विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी, नाव न घेता पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *